• Sat. Jun 13th, 2026

    संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 4, 2026
    संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि.४ — सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची  जगात ऐतिहासिक ओळख  निर्माण झाली असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    कांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रम, सिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संतांनी आपल्या प्रबोधनातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधली आहे. संतांच्या विचारांमधून सामाजिक व शैक्षणिक कार्याला दिशा मिळाली. संतमत परंपरेत मानवसेवा, समता, प्रेम व सद्भावना ही केवळ तत्त्वे नसून ती प्रत्यक्ष आचरणात आणण्याची जीवनपद्धती आहे. या मूल्यांच्या प्रसारासाठी श्री सद्गुरु  शरणानंदजी महाराज परमहंस यांच्या अनुयायांच्या माध्यमातून संतमत अनुयायी आश्रमाद्वारे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य सुरू आहे.

    मुख्यमंत्री  म्हणाले की, संतमत अनुयायी आश्रमांचे कार्य समाजाला सेवेकडे आणि प्रेमाकडे नेणारे आहे. मानवसेवा, समता, प्रेम व सद्भावना या मूल्यांच्या जपणुकीसाठी आश्रमाचे योगदान अमूल्य असून, हेच संतमत परंपरेचे खरे स्वरूप आहे.

    संतमत परंपरेतील परमहंस महाराजांनी जात-पात व भेदभावाला विरोध करून मानवधर्म प्रधान मानला. त्यांनी आत्मज्ञान, अहंकार,त्याग व मानवसेवेचा संदेश दिला. भारतीय संस्कृतीतील गीता ही केवळ विचारधारा नसून, संस्कृती व सभ्यता जपत उत्तम जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संस्कृती जपण्याचे महान कार्य संतपरंपरेने केले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

    यावेळी  माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमित साटम, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकर, संतमत अनुयायी आश्रम ट्रस्टचे सचिव राधेश्याम यादव यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed