• Wed. Mar 11th, 2026

    ‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 3, 2026
    ‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला – महासंवाद


    मुंबई, दि. ३:- जनसाहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि ‘अक्षरवैदर्भी’ चे आधारस्तंभ ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.सुभाष सावरकर यांच्या निधनामुळे मराठी जनसाहित्य चळवळ पोरकी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. डॉ. सावरकर यांनी जनसाहित्य चळवळीचा प्रवाह निर्माण केला. यातून त्यांनी समीक्षा- संशोधनाला चालना देणारे शोधप्रकल्प जाणीवपूर्वक राबविले. डॉ. सावरकर अभियांत्रिकी क्षेत्रातून आले. पण त्यांनी ‘अक्षरवैदर्भी’च्या माध्यमातून जनसाहित्याचा विचार आणि चळवळीला प्रोत्साहन दिले. या वाटचालीत त्यांनी आशयघन आणि वैविध्यपूर्ण साहित्यकृतींची निर्मिती केली. विशेषतः १२ समीक्षा ग्रंथ सिद्ध केले. त्यांच्या ‘संतवाङ्मयाचे जनसाहित्य मूल्य’, आणि ‘जनभाषेच्या शोधात’ या ग्रंथाना पुरस्कार देखील मिळाले. जनसाहित्य विषयावर सातत्यपूर्णरित्या राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन तसेच राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनांसारख्या महत्वपूर्ण आणि अभिनव उपक्रमांची त्यांनी साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली. त्यांच्या निधनामुळे जनसाहित्य चळवळ पोरकी झाली आहे. पण त्यांचे कार्य ‘अक्षरवैदर्भी’ च्या रुपाने सदैव दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करत राहील. डॉ. सावरकर यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते व कुटुंबियांना झालेल्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ प्रा. सुभाष सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed