नागपुरातील एका कुटुंबातील प्रकाराने अनेकांना अस्वस्थ केले आहे. एका अल्पवयीन मुलाशी संबंधित या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे. नेमकं काय घडलं?
पीडित मुलाचे आई-वडील मोलमजुरीचे काम करतात. उदरनिर्वाहासाठी दोघांनाही दिवसभर घराबाहेर राहावे लागत असल्याने घरात कोणी नसते. या काळात मुलाचे वर्तन बिघडत चालल्याचा दावा पालकांनी केला आहे. मुलाला चोरीची सवय लागली होती, तो घराबाहेर जाऊन मोबाईल, सायकलसारख्या वस्तू उचलून आणत असे. तसेच तो आपल्या भावालाही सोबत घेऊन जात असल्याचे आईने सांगितले.
या प्रकरणावर पीडित मुलाच्या आईने प्रतिक्रिया देताना धक्कादायक कबुली दिली आहे. परिसरातील नागरिकांकडून आमच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या. आम्ही त्याला अनेकदा समजावून सांगितले, मारूनही पाहिले, पण तो काही ऐकत नव्हता. आम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो, मात्र तो तिथूनही पळून जायचा, असे आईने सांगितले. या सगळ्या परिस्थितीला कंटाळून आणि मुलगा कुठे बाहेर जाऊन चुकीचे कृत्य करू नये, या हेतूने आम्ही त्याला साखळदंडाने बांधून ठेवण्याचा निर्णय घेतल्याची कबुली आई-वडिलांनी दिली आहे. आणि आम्ही त्याला दिवसातून फक्त दोन तास बांधून ठेवत असल्याचे त्याचा आई ने सांगितले.
Solapur Crime: मनसे नेते बाळासाहेब सरवदे हत्येप्रकरणी भाजप आमदार अन् मुलावर बड्या नेत्यांचे खळबळजनक आरोप
मात्र, तज्ज्ञांच्या मते हा प्रकार अत्यंत गंभीर आणि अमानवी आहे. कोणत्याही परिस्थितीत मुलावर अशी वागणूक योग्य ठरू शकत नाही. मुलाचे वर्तन समस्यात्मक असले तरी त्यावर समुपदेशन, वैद्यकीय उपचार, शाळा प्रशासन किंवा बालकल्याण यंत्रणांची मदत घेणे आवश्यक होते. शारीरिक बंधन आणि मानसिक छळ केल्याने मुलाच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बालकल्याण समितीने तातडीने दखल घेतली आहे. मुलाला सुरक्षित ठिकाणी हलवून त्याचे समुपदेशन तसेच वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पालकांविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असून चौकशी सुरू आहे.
