• Sat. Mar 7th, 2026
    ‘मातोश्री’च्या अंगणात मनसेमध्ये बंड, 19 वर्षांची साथ सोडत 11 शिलेदारांचे राजीनामे, राज ठाकरेंना म्हणाले…

    BMC Election : वांद्रे परिसरातील प्रभागांत उद्धव ठाकरे यांच्या ‘मशाल’ चिन्हावरील उमेदवार रिंगणात उतरवल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती झाली आहे. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या अंगणातच युतीला हादरे बसले आहेत. कारण वांद्रे पूर्व येथील बालेकिल्ल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मधील मनसेच्या तब्बल ११ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

    उद्धव ठाकरे यांच्या ‘मशाल’ चिन्हावरील उमेदवार रिंगणात उतरवल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पक्षनिर्मितीपासून निष्ठावंत राहिलेल्या मनसैनिकांनी पुकारलेल्या बंडाचा मनसेला आणि परिणामी ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात ९ मार्च २००६ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या १९ वर्षे ९ महिन्यांच्या राजकीय प्रवासाला अखेरचा जय महाराष्ट्र करत असल्याचे म्हटले आहे.

    वांद्रे येथील प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मध्ये उमेदवारी वाटपावरुन पेच निर्माण झाला. एका प्रभागात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार बाळा चव्हाण हे ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे मनसेकडून दिप्ती काते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
    Maharashtra TimesDevendra Fadnavis : निकालाआधीच विरोधकांचा ‘निकाल’! महायुतीने शंख फुंकला, विजयी उमेदवाराला फोन करत फडणवीस म्हणाले…
    ठाकरे बंधूंची युती झाली असली तरी, याच प्रभागातून मनसेकडून इच्छुक असलेल्या निष्ठावंतांना डावलण्यात आल्याची भावना या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या नाराजीतूनच अनेक वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले.

    या पदाधिकाऱ्यांनी १९ वर्षे ९ महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. मनसेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकाऱ्यांनी अचानक सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
    Maharashtra TimesUddhav Thackeray : ठाकरेंचे एक-दोन नव्हे 82 उमेदवार बाद करण्याची खेळी, भाजपचा मोठा डाव उलटला, कारण ठरलं…

    सामूहिक राजीनाम्यांमध्ये कोणत्या पदाधिकाऱ्यांचा समावेश?

    विजय काते – उपविभाग अध्यक्ष
    जितेंद्र गावडे – शाखा अध्यक्ष
    भाऊराव विश्वासराव – शाखा सचिव
    विजय कुलकर्णी – उपशाखा अध्यक्ष
    अॅड. अशोक शुक्ला – उपशाखा अध्यक्ष
    नरेंद्र कौंडिपुजला – उपशाखा अध्यक्ष
    प्रविण पाटील – उपशाखा अध्यक्ष
    रोहित गोडीया – उपशाखा अध्यक्ष
    अजय कताळे – उपशाखा अध्यक्ष
    दत्ताप्रसाद देसाई – उपशाखा अध्यक्ष
    आकाश आवळेकर – मनविसे उपविभाग अध्यक्ष

    तेजस्वी घोसाळकरांसमोरच सुनावलं, निष्ठावंत कार्यकर्ते नाराज, भाजपच्या मेळाव्यात उघडपणे बोलल्या

    या घटनेमुळे मनसेच्या स्थानिक पातळीवरील बांधणीला तडा जाण्याची शक्यता आहे. विशेषतः वांद्रेसारख्या बालेकिल्ल्यात एवढ्या मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देणे हे पक्षासाठी चिंतेचे कारण ठरू शकते. उमेदवारी वाटपातील नाराजी हे यामागील प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा