• Fri. Mar 6th, 2026
    Navi Mumbai : ऑनलाईन प्रेमाचा थरार, प्रेयसीच्या भेटीला गेला अन् जाळ्यात अडकला; नवी मुंबईत तरुणासोबत नेमकं काय घडलं?

    Navi Mumbai Crime : नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. ऑनलाईन प्रेमाचा थरार या घटनेत पाहायला मिळाला आहे.

    नवी मुंबई क्राइम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : सोशल मीडियावरून मैत्री, प्रेमाचा बनाव आणि त्यातून थेट अपहरण व खंडणी असा थरारक प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. मुलगी असल्याचे भासवून इन्स्टाग्रामवर एका चौकडीने 15 वर्षीय मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्याचा विश्वास संपादन केला. भेटीच्या बहाण्याने कल्याण (पूर्व) येथील नांदिवलीत बोलावून त्याचे अपहरण केले. या अपहरणानंतर नातेवाइकांकडे व्हॉट्सॲप व्हॉइस मेसेजद्वारे तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. मात्र, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत चौघांना अटक करत मुलाची सुखरूप सुटका केली.

    ऑनलाईन प्रेमाचा थरार

    या घटनेतील 15 वर्षीय अपहृत मुलगा दहावीत शिकतो. या प्रकरणातील आरोपींनी बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून मुलगी असल्याचे भासवले. त्यानंतर अपहृत मुलाशी नियमित चॅटिंग करीत प्रेमसंबंध असल्याचा आभास निर्माण करून त्याचा पूर्ण विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी प्रेयसीमार्फत या मुलाला भेटण्यासाठी कल्याण (पूर्व) येथील नांदिवलीचा पत्ता देऊन त्याला बोलावून घेतले. या आमिषाला बळी पडत अपहृत मुलगा ॲपआधारिक कारने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. मात्र त्या ठिकाणी वाट पाहत उभ्या असलेल्या चौघा अपहरणकर्त्यांनी त्याला ताब्यात घेऊन तेथील इमारतीतील एका खोलीत डांबून ठेवले.
    Maharashtra TimesYavatmal News : लेकरु झाल्याचा आनंद, अख्ख्या गावाला बातमी, बाळाला बघायला जाताना अनर्थ; वाटेतच बापाचा मृत्यू

    24 तासात मुलाची सुखरुप सुटका

    अपहरणकर्त्यांनी मुलाच्या नातेवाइकांशी संपर्क साधून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर अपह्रत मुलाच्या नातेवाइकांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1 च्या पथकाने घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासातून गाडीचा क्रमांक शोधून चालकाला ताब्यात घेण्यात आले.
    Maharashtra TimesPranita Rasam : शूटिंग संपवून मायलेकी निघाल्या, मराठी मालिकेतील बालकलाकाराच्या आईचा भांडुप अपघातात मृत्यू, पूर्वाच्या डोळ्यासमोर…

    नवी मुबंई गुन्हे शाखेची कामगिरी

    चौकशीत चालकाने मुलाला नांदिवली येथे सोडल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी नांदिवली राजाराम नगर येथील साई आराधना अपार्टमेंटमधील खोली क्रमांक 1 मध्ये छापा टाकताच अपहृत मुलगा चारही आरोपींसह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी अपह्रत मुलाची सुटका करून प्रदीपकुमार जयस्वाल (वय 24), विशाल पासी (वय 19), चंदन मौर्या (वय 19) आणि सत्यम यादव (वय 19) या चार जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ३१डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा