Mumbai Elections: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अर्जाच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस–वंचित आघाडीत गोंधळ उडाला. वंचितकडून परत आलेल्या 21 पैकी 16 जागांवर काँग्रेसला उमेदवार देता न आल्याने पक्षात तीव्र नाराजी पसरली असून, या जागांवर पुढील निर्णय काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुंबई काँग्रेसकडून वंचितला थेट ६२ जागा देण्यात आल्या. पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी असताना काँग्रेसने ६२ जागा वंचितला आणि काही जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्याने काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नाराजीनाट्याला शमविण्यासाठी काँग्रेसच्या नेते मंडळींची प्रयत्नांची पराकष्ठा सुरू असतानाच मंगळवारी निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी नवा वाद सुरू झाला.
BMC Election : धाकधूक.. उत्कंठा.. अन् दुपारी अडीचला AB फॉर्म हाती, राज ठाकरेंच्या’शिवतीर्था’बाहेर काय-काय घडलं?
काँग्रेसने ‘वंचित’ला सोडलेल्या ६, ११, १२, १३, १४, १५, २१, ३०, ४६, ७३, ८०, ८४, ८५, १०८, ११७, १५३, १७७, १८२, १९५, १९८, २०७ या प्रभागांतील जागा परत करण्यात आल्या होत्या. त्यातील १६ जागांवर आघाडीचा अधिकृत उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला नसल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. दरम्यान, मंगळवारी ‘वंचित’ने या १६ जागा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना परत केल्या होत्या, असा दावा वंचितच्या ज्येष्ठ नेत्याने केला. नाराजी, योग्य उमेदवार नसल्याने या जागा परत केल्याचेही सांगण्यात आले.
मातोश्रीवरून निराशा, उमेदवारी नाकारली; रडत-रडत ठाकरेंच्या रणरागिणीने सगळं सांगितलं
निर्णय काय ?
अधिकृत उमेदवार देण्यात मित्रपक्ष असमर्थ ठरल्याने काँग्रेसमध्ये कमालाची नाराजी पसरली आहे. इच्छुक आणि प्रभावी उमेदवार नसतानाही त्यांनी मतदारसंघ घेतले. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे. उमेदवार नव्हते, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधणे गरजेचे होते, असे मत काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. आता या १६ जागांबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
