• Sat. Mar 7th, 2026
    BMC Election: मुंबईत ‘हाताला ‘वंचित’ची साथ; महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचितची युती जाहीर, कोणाला किती जागा?

    मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, मुंबईत सर्वात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अखेर काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत या दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

    या नव्या समीकरणानुसार, जागावाटपाचा आकडाही समोर आला आहे. मुंबईत काँग्रेस तब्बल १५६ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे असं सांगितलं जात आहे. तर वंचित बहुजन आघाडीला ६२ जागा देण्यात आल्या आहेत. याची बद्दलच अधिकृत्र पत्रकही वंचितच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आलं आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोबतही चर्चा सुरू असली, तरी सध्या त्यांना केवळ ९ जागांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते स्वबळावर लढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे.

    दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही युती केल्याने मुंबईत ‘मराठी व्होट बँक’ विरूद्ध ‘महायुती’ आणि ‘काँग्रेस-वंचित’ असा त्रिकोणी संघर्ष पाहायला मिळणार आहे. पुण्यात मात्र महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. या सर्व घडामोडींमुळे मुंबईच्या महापौरपदावर कोण बसणार, याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

    आता हात लावला तर जशास तसे उत्तर देवू! अमराठी व्यापाऱ्याला मारहाण प्रकरणावर जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा इशारा

    त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची ऐतिहासिक युती अखेर निश्चित झाली आहे. सोशल मीडियावर जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले नशीब आजमावणार आहे.

    या निर्णयाला वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे हिरवा कंदील दाखवला आहे. विशेष म्हणजे, या ६२ जागांच्या यादीवर दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या असून, यात आता कोणताही बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने वॉर्ड क्र. ६, ११, १२, ८४, ९५, १२७, १५३ आणि २२५ यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश ‘वंचित’साठी करण्यात आला आहे.

    वंचित काँग्रेसमधील युतीमुळे दलित, मुस्लिम, बहुजन मतांचं विभाजन टाळता येणार आहे. ज्याचा या दोन्ही पक्षांना मोठा फायदा होऊ शकतो. या युतीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed