• Tue. Jun 9th, 2026
    मृत्यूनेही वेगळं केलं नाही! अपघातात पत्नी गेली, २४ तास उलटताच पतीनेही जग सोडले; एका सुखी संसाराचा करुण अंत

    गोवा हायवेवर झालेल्या भीषण अपघाताने एका सुखी संसाराचा अचानक अंत झाला. पनवेल तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड: गोवा हायवेवर झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा सलग दोन दिवसांत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण पनवेल तालुक्यात शोककळा पसरली आहे. डोलघर येथील विद्या विठ्ठल गायकर आणि विठ्ठल गायकर हे पती-पत्नी या दुर्दैवी अपघाताचे बळी ठरले आहेत. अवघ्या २४ तासांत दोघांचाही मृत्यू झाल्याने एका सुखी संसाराचा अचानक अंत झाला.

    २२ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास विठ्ठल गायकर आणि त्यांची पत्नी विद्या गायकर हे ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटी (क्रमांक एमएच ४६ सीयू ७१२२) वरून पळस्पेकडून पेणच्या दिशेने गोवा हायवेने प्रवास करत होते. पनवेल हद्दीतील क्षणभर विश्रांती हॉटेलसमोरील रस्त्यावर सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकर ट्रकने (क्रमांक एमएच ४६ सीयू २३०६) त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या धडकेत स्कुटीवरील दोघेही गंभीर जखमी झाले.

    अपघातानंतर तातडीने दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र विद्या गायकर यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या निधनाची बातमी कळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, अपघातात जखमी झालेले विठ्ठल गायकर यांची प्रकृतीही चिंताजनक होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र २३ डिसेंबर रोजी उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी पतीचा मृत्यू झाल्याने ही घटना अधिकच वेदनादायी ठरली आहे.

    Maharashtra TimesAshish Shelar: ठाकरे बंधू एकत्र, राजकारण तापलं; युतीनंतर आशिष शेलारांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले ‘तुमच्या शॉर्टफिल्ममध्ये….’

    या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सिमेंट बलकर ताब्यात घेतला आहे. संबंधित चालकाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा सखोल तपास करण्यात येत आहे. डोलघर गावात अत्यंत साधे, शांत आणि सर्वांशी मिळून-मिसळून राहणारे दांपत्य म्हणून गायकर दांपत्याची ओळख होती. त्यांच्या अचानक निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    वाढते रस्ते अपघात आणि अवजड वाहनांच्या बेदरकार वाहनचालना बाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा