• Sun. Mar 15th, 2026
    जिथे जुन्या नात्याच्या जखमा, तिथेच नव्या नात्याची मुहूर्तमेढ, हॉटेल ब्ल्यू सीबाबत ठाकरेंचे योगायोग

    Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Ghoshna : ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करण्यासाठी निवडलेल्या ब्ल्यू सी हॉटेलबाबत एक महत्त्वाचा योगायोग आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : ठाकरे बंधू यांनी अखेर मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी बीएमसी निवडणूक साठी युती करत असल्याची औपचारिक घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईतील वरळी भागात असलेल्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर केली. उद्धव आणि राज यांच्यासोबत खासदार संजय राऊतही व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, असं राज ठाकरे यांनी जोरकसपणे सांगितलं. कुठल्याही भांडण किंवा वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, मुलाखतीत म्हटलेल्या एका वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

    काय आहेत योगायोग?

    दरम्यान, ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करण्यासाठी निवडलेल्या ब्ल्यू सी हॉटेलबाबत एक महत्त्वाचा योगायोग आहे. हे हॉटेल आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात तर आहेच, मात्र २०१९ मध्ये शिवसेना-भाजपच्या बहुचर्चित युतीची घोषणा भाजप नेते अमित शहा आणि शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वरळी येथील याच ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झाली होती. आता सहा वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेना-मनसे यांच्या बहुप्रतीक्षित युतीची घोषणा देखील याच हॉटेलमध्ये झाल्याने या विलक्षण योगायोगाची चर्चा रंगली आहे.
    Maharashtra TimesCabinet Decisions : एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर

    मातोश्रीवरील बंद दाराआडची बैठक

    हॉटेल ब्ल्यू सी येथील या पत्रकार परिषदेआधीच मातोश्रीवर अमित शाहांसोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेचा उल्लेख राजकारणात गाजत आला. बाळासाहेबांच्या खोलीत दिलेले वचन मोडल्याचा दावा करत उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभेत भाजपसोबत एकत्र लढूनही निकालानंतर युती तोडली आणि ऐतिहासिक महाविकास आघाडीचा प्रयोग केला.

    Raj Thackeray यांनी एक पाऊल मागे घेतलं, BJP विरोधात लढण्याचा ठाकरेंचा प्लॅन ठरला!

    तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 50-50 टक्के जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. मात्र विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि निकालाच्या दिवसापासूनच उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीतच ठरल्याचा दावा केला होता.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा