• Tue. Mar 10th, 2026
    Nagpur Election Result: विदर्भात भाजपचा बावनकशी विजय; शंभरपैकी 52 नगराध्यक्ष विजयी, काँग्रेसच्या पारड्यात 21 जागा

    नागपूर: विदर्भातील ८० नगर परिषदा आणि २० नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या एकूण शंभर नगराध्यक्षपदांपैकी भाजपने सर्वाधिक ५२ जागांवर विजय मिळविला. काँग्रेसने २१ जागांवर विजय प्राप्त केला.

    राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचातीची निवडणूक २ डिसेंबर रोजी घोषित झाली होती. निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार होता. मात्र काही जागांबाबत आक्षेप उपस्थित झाल्याने हा विषय न्यायालयात गेला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशावरून राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठीची निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यांत झाली.

    Nagpur Elections Results: महायुतीला ऐतिहासिक विजय, भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष, नागपुरात 35 वर्षांनी पहिल्यांदाच हे घडलं
    दुसऱ्या टप्प्याचे मतदान शनिवारी झाले. एकत्रित निकाल रविवारी जाहीर झाला. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारपर्यंत निकाल आले. मतचोरी, मतदारांना पैशांचे वाटप, उमेदवारांची फोडाफोड अशा विविध मुद्द्यांनी ही निवडणूक गाजली. दरम्यान, भाजप आणि महायुतीच्या यशाबद्दल पक्षाच्या नरिमन पॉइंट येथील मुख्यालयाजवळ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला.

    आजी-माजी प्रदेशाध्यक्षांना धक्का
    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाण्यात शिवसेनेच्या पूजा गायकवाड यांनी विजय मिळविला. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्या भंडारा जिल्ह्यातील चारपैकी एकाही नगर परिषदेत सत्ता मिळविता आली नाही. या आजी-माजी प्रदेशाध्यक्षांच्या ‘होमटाउन’ मधील पराभव चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि या निवडणुकीचे राज्य प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या मतदारसंघातील कामठीत पहिल्यांदा भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणला. गडचिरोली आणि वाशीम जिल्ह्यातील एकाही नगर परिषदेत काँग्रेसला सत्ता मिळालेली नाही. कधीकाळी काँग्रेसचा गड म्हणून विदर्भाची ओळख होती. २०१४नंतर या गडाला हळूहळू खिंडार पडू लागले आहे. वर्धा आणि गोंदिया जिल्ह्याने मात्र काँग्रेसला साथ दिली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.
    Maharashtra TimesAmbernath Election Result: श्रीकांत शिंदेंना अंबरनाथमध्ये मोठा धक्का; सर्वाधिक नगरसेवक येऊनही नगराध्यक्षपदाची हुलकावणी
    भाजपची संख्या ‘बेरजे’च्या तोडीची
    नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप ११७ नगराध्यक्षपदांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. या पक्षाला मिळालेल्या जागा अन्य पाच पक्षांच्या बेरजेपेक्षा थोड्याच कमी आहेत. भाजपची ही एकपक्षीय बेरीज तुलनेत अन्य पक्षांच्या तोडीची ठरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने नगराध्यक्षपदाच्या ५३ जागी विजय मिळविला. हा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. तिसऱ्या स्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३७ नगराध्यक्षपद मिळवित तिसरा, तर काँग्रेसने २८ जागांसह चौथा क्रमांक मिळविला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नऊ, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सातच जागांवर समाधान मानावे लागले. उर्वरित ३७ नगरपरिषद तसेच नगरपंचायतींत अन्य पक्ष तसेच अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झाले.

    विदर्भातील नगराध्यक्ष (नप, नपं) एकूण : १००
    भाजप –५२
    काँग्रेस –२१
    शिवसेना –७
    राष्ट्रवादी काँग्रेस –४
    शिवसेना (उबाठा) –५
    वंचित बहुजन आघाडी –२
    राष्ट्रवादी काँग्रेस (शप) — १
    प्रहार –१
    जनशक्ती आघाडी –१
    शेकाप –१
    गोंगप (काँग्रेस समर्थित) –१
    एमआयएम –१
    अपक्ष –३
    Maharashtra TimesMaharashtra Election Results: भाजपच ‘शंभर नंबरी’! नगर परिषद निवडणुकीत 117 ठिकाणी नगराध्यक्ष; 1100 नगरसेवक विजयी
    ही निवडणूक मुक्त वातावरणात झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नीतीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या कामावर जनता प्रचंड नाराज आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. जनतेची कामे होत नाहीत. अशा परिस्थितीत आलेले निकाल जनतेचा कौल वाटत नाही. -हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

    नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेला अभूतपूर्व विजय हा जनतेच्या विश्वासाचा कौल आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या विश्वासाने जनतेने कमळाला मतदान केले, त्याच विश्वासाची पुनरावृत्ती या निकालात झाली आहे. हा विजय म्हणजे ‘देवाभाऊं ‘वर जनतेचा अढळ विश्वास आहे. – चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे महसूलमंत्री

    नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेला विजय हा अभूतपूर्व विजय आहे. ही भारताच्या इतिहासातील पहिली निवडणूक असेल, ज्यात एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कुणावरही सूतभरही टीका करीत नाही, तरी त्यांचा पक्ष विजयी होतो. जनतेने आमच्या विकासकामांना दिलेली ही पावती आहे. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed