• Sat. Mar 14th, 2026
    ‘जितकी टीका केली, तितकाच पाठिंबाही दिला’; शालिनीताईंच्या निधनानंतर शरद पवार भावूक

    महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या शालिनीताई पाटील यांचे निधन झाले. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. शरद पवारांनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाच्या आठवणींना उजाळा दिला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या धारदार वक्तृत्वाने आणि अभ्यासू वृत्तीने स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या माजी कॅबिनेट मंत्री आणि माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी असलेल्या शालिनीताईंनी राज्याच्या राजकारणात अनेक दशके सक्रिय भूमिका बजावली. कधी काळाच्या पुढे जाणारी मते, तर कधी थेट स्वकीयांवर केलेली प्रखर टीका, यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या.

    त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भावूक ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने “शरदचं नेतृत्व मान्य करा,” हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत,’ अशा शब्दांत पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील शालिनीताईंचे महत्त्व आणि त्यांच्या स्पष्टवक्तेपणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

    ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील यांनी आज मुंबईतल्या माहिमध्ये असलेल्या त्यांच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. शालिनीताई पाटील या 94 वर्षांच्या होत्या, गेले काही दिवस त्या आजारी होत्या अशी माहिती मिळते आहे. आता मात्र वृद्धापकाळाने आज त्यांची प्राणज्योत माळवली आहे. याबद्दलची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही पोस्ट करुन दिली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय जगतात शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांना श्रंद्धांजली वाहिली आहे.

    Maharashtra Times‘पिंपरीचा दादा’ विरुद्ध ‘बारामतीचा दादा’! महेश लांडगेंनी राष्ट्रवादीचं घर फोडलं; संजोग वाघेरेंपासून शितोळेंपर्यंत बड्या नेत्यांची भाजपात उडी

    दरम्यान, वसंतदादा पाटील, शालिनीताई पाटील आणि शरद पवार यांच्यातील संबंध हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या नात्यांमध्ये आदर, राजकीय बंडखोरी, तीव्र विरोध अन् पुन्हा जवळीक अशी अनेक वळणं पाहायला मिळालेली आहेत.

    शरद पवारांवर टीका

    शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. मात्र, १९७८ मध्ये शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ‘पुलोद’ प्रयोग खूप गाजला होता. या घटनेला शालिनीताईंनी शरद पवारांनी “वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला” असे म्हणत शरद पवारांवर टीका केली होती. तेव्हापासून वसंतदादा आणि शरद पवार यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली होती.

    पवारांशी मतभेद

    शालिनीताई पाटील या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होत्या. वसंतदादांच्या निधनानंतरही त्यांनी पवारांच्या विरोधातील आपली भूमिका कायम ठेवली होती. विशेषतः ‘आर्थिक निकषावर आरक्षण’ या मुद्द्यावरून त्यांचे पवारांशी तीव्र मतभेद झाले होते.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा