याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास परतूर येथील रहिवासी विष्णू मगर (वय ४५) हे काही कामानिमित्त रेल्वेने जालना शहरात आले होते. रेल्वे स्टेशन परिसरातून बाहेर जात असताना तेथे उपस्थित असलेल्या काही भोरट्या चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांची अंगझडती घेऊन खिशातील रोख रक्कम व मोबाईल फोन हिसकावून घेतला.
या चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता, विष्णू मगर यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच त्यांच्याजवळील धारदार चाकू काढून त्यांच्या बरगडीत वार केला. अचानक झालेल्या चाकू हल्ल्यामुळे विष्णू मगर घाबरले आणि जीवाच्या भीतीने मोबाईल व पैसे चोरट्यांच्या हातात असतानाच तेथून पळ काढला.
इंजिनिअर बायको, उपमुख्यमंत्र्यांची ताकद अन् मुंबईहून थेट नांदेड! प्रभाग ३ मध्ये ‘या’ एन्ट्रीने नेत्यांची झोप उडाली
रेल्वे स्टेशन परिसरातून बाहेर येताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी त्यांची मदत केली. विष्णू मगर पूर्णतः रक्ताने माखलेले असल्याचे दिसून येत होते. तात्काळ एक ऑटो रिक्षा बोलावून त्यांना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती कदीम पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी विष्णू मगर यांची विचारपूस केली व त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
तपासणीदरम्यान विष्णू मगर यांच्या डोक्याला आणि बरगडीत धारदार चाकूचे गंभीर वार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, हल्ला करणाऱ्या चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, रेल्वे स्टेशन परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण जालना शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपी चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
