Maharashtra Weather Today : मुंबईसह राज्यभरात थंडीची लाट कमी होत आहे. याशिवाय अनेक शहरात तापमानात वाढ होत असून दुपारच्या वेळी काहीशी उष्णता जाणवू लागली आहे.
मुंबईत प्रदूषणाची पातळी खालावली
भारतीय हवामान खात्याने अर्थात IMD ने मुंबईत हवेची गुणवत्ता ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे. मुंबईचा AQI अर्थात एकूण वायु गुणवत्ता निर्देशांक पहाटेच्या वेळी 254 वर होता, ही हवामानाची अतिशय वाईट श्रेणी आहे. मागील आठवड्यात मुंबईत हवेची गुणवत्ता चांगली होती. मात्र आता पुन्हा एकदा मुंबईत प्रदूषणाची पातळी खालावली आहे. रस्ते, मेट्रो, इमारती अशा बांधकामांमुळे या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशात वृद्ध, लहान मुलांनी विशेष काळजी घेण्याचं सांगण्यात आलं आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा जोर ओसरला, पण मुंबई, पुणे, ठाण्यात गारठा कायम; काय सांगतो IMD चा अंदाज?
पुण्यात तापमानात वाढ
शहरात आठवडाभरात दहा अंशांखाली रेंगाळलेला तापमानाचा पारा मंगळवारी वर सरकला. दिवसभरात कमाल 29.8 आणि 10.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांत थंडीची लाट ओसरणार आहे. टप्प्याटप्प्याने तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला.
९ वर्षांनंतर पुणेकर निवडणार नवे प्रतिनिधी; विमाननगर-वाघोली प्रभागातील नागरिक काय म्हणाले?
महाराष्ट्रातील अनेक शहरात तापमानाचा पारा वाढला
मध्य महाराष्ट्रासह पुण्यामध्ये आठवडाभर कडाक्याची थंडी पडली होती. सकाळी दहापर्यंत गारठा, दुपारी ऊन आणि संध्याकाळनंतर पुन्हा गारवा असं वातावरण पुणेकरांनी अनुभवलं. संपूर्ण आठवडा किमान तापमान सात ते नऊ अंशाच्या खाली रेंगाळले होते. मात्र, बुधवारी पारा दहा अंशाच्या पुढे गेला. उपनगरांमध्ये मात्र नऊ अंशांदरम्यान तापमान नोंदवलं गेलं. पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह कोकण प्रदेशात कमाल तापमानात वाढ होत आहे. मराठवाड्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भात, विशेषतः पूर्वेकडील भागात, थंडीची लाट जाणवेल.
