Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुंबई महापालिकेत ५० जागा लढविण्याची तयारी केली आहे. परंतु काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची तयारी केल्याने आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली असून, सध्या फक्त दोन माजी नगरसेविका पक्षात आहेत.
मुंबईत अस्तित्वासाठी चाचपडणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर, दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीत अखंड राष्ट्रवादीचे केवळ नऊ नगरसेवक निवडून आले होते. पक्षफुटीनंतर यापैकी पाच नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेले, तर दोन नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत दाखल झाले. सध्या पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव आणि मनीषा रहाटे या दोनच माजी नगरसेविका पक्षात आहेत.
महापालिका निवडणुकीमध्ये तिकीट मिळण्याची संधी दिसत असल्याने इच्छुकांमध्ये उत्साह असेल, अशी अटकळ होती. त्यासाठीच इच्छुकांकडून सशुल्क अर्ज भरून घेत, त्यांच्या मुलाखती घेण्याचे नियोजन होते. त्यासाठी १० नोव्हेंबरपासून विशेष मोहीमही आखली. परंतु, केवळ २५० इच्छुकांनीच निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. यातील अनेक अर्ज हे एकाच उमेदवाराने दोन-तीन जागांसाठीही केले आहेत.
मुंबईत पक्षाचा ५० जागांवर निवडणूक लढविण्याचा विचार असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना दिली. मुंबईत केवळ भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला युतीतून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचा फायदा राष्ट्रवादी शप पक्षाच्या उमेदवारांना नक्कीच होईल, असाही दावा या नेत्याने केला. मात्र निवडणूक जाहीर होऊन २४ तास उलटले, तरी आघाडीबाबत स्पष्टता नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
