• Thu. Mar 12th, 2026

    रात्र वैऱ्याची! शेवटची लढाई…; मुंबईत रातोरात पोस्टर लागले; रहिवासी म्हणतात, हे शब्द तर…

    रात्र वैऱ्याची! शेवटची लढाई…; मुंबईत रातोरात पोस्टर लागले; रहिवासी म्हणतात, हे शब्द तर…

    मुंबईसह सर्व महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहेत. राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येऊन महायुतीविरुद्ध लढण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: निवडणूक आयोगानं काल पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुंबई, ठाण्यासह सगळ्या महापालिकांमध्ये १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. या पार्श्वभूमीवर आता सगळ्याच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा मुकाबला होण्याची दाट शक्यता आहे.

    गेल्या सहा महिन्यांत ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. अनेक वर्षांपासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात कटुता होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबाचे संबंधदेखील बिघडले. पण मागील सहा महिन्यांत परिस्थिती बरीच बदलली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये युती करुन लढण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे यासाठीची वातावरण निर्मिती जमिनीवर सुरु झालेली आहे.
    Maharashtra Timesअखेर ‘तो’ दिवस जवळ आला! फडणवीसांच्या घोषणेनंतर घडामोडींना वेग; पवारांकडून लवकरच मोठी घोषणा
    शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मागाठाण्यातील अनेक प्रभागांमध्ये गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी काळ्या रंगांचे पोस्टर लागले आहेत. लहान मोठ्या आकाराचे कागदी पत्रक प्रभाग क्रमांक ४, ५, ११ मध्ये लावण्यात आले आहेत. दहिसर पूर्वेकडे असलेल्या रावळपाड्याच्या अखेरच्या बस थांब्यापासून ते अगदी बोरीवली रेल्वे स्थानकापर्यंत कागदी पत्रक लागले आहेत. काळ्या रंगाच्या पोस्टरवरुन मराठी माणसांना एकजूट राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

    ‘मराठी माणसा जागा हो! रात्र वैऱ्याची आहे! ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे!’, असा मजकूर पोस्टरवर आहे. ‘पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नसते. मराठी माणसा मुंबई वाचव! ही तुझ्या अस्तित्त्वाची लढाई आहे. यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल!’, असं आवाहन पोस्टरमधून करण्यात आलं आहे. ‘मराठी माणसा जागा हो! तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जात आहे! यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल!’, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आहेत.
    Maharashtra TimesAmit Shah: चार्टर्ड प्लेनमधील ‘त्या’ सेल्फीमुळे भाजप नेते गोत्यात; अमित शहांनी सुनावलं, नेमकं काय घडलं?
    पश्चिम उपनगरात येणाऱ्या दहिसर पूर्वेतील रावळपाडा, अशोकवन, बोरिवली पूर्वेतील सावरपाडा, बोरिवली रेल्वे स्थानक, कांदिवली पश्चिमेला असलेल्या चारकोप परिसरात अनेक ठिकाणी पोस्टर चिकटवण्यात आले आहेत. या पोस्टरवर कोणत्याही पक्षाचा, नेत्याचा उल्लेख नाही. ते कोणी लावले याचीही कल्पना नाही. रातोरात हे पोस्टर लावण्यात आले. त्यामुळे त्याबद्दलचं गूढ कायम आहे. जमीन परत गेली की परत मिळत नसते, ही अखेरची संधी, असे शब्द मनसे प्रमुख राज ठाकरेंनी गेल्या काही महिन्यांत बऱ्याचदा वापरले होते. त्यामुळे या पोस्टरमागे मनसे असावी, अशी चर्चा परिसरातील रहिवाशांमध्ये आहे.

    महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४, ५, ११, १८ मध्ये कागदी पत्रक चिकटवण्यात आले आहेत. या सगळ्या जागा २०१७ मध्ये शिवसेनेनं जिंकल्या होत्या. यापैकी प्रभाग क्रमांक ४ चा अपवाद सोडता अन्य सगळ्याच प्रभागाचे माजी नगरसेवक शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ठाकरेसेनेसमोर मोठं आव्हान आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा