• Sat. Mar 7th, 2026
    Balasaheb Thorat: निवडणूक जाहीर होताच थोरातांचा आयोगावर घणाघात! मतदार यादीतील दुबार नावांवरून  ‘पोरखेळा’चा आरोप

    राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारीला मतदान होईल. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मतदार यादीतील गोंधळावरून निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या २७ आणि नव्याने स्थापन झालेल्या दोन अशा एकूण २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल आज वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने १५ जानेवारी रोजी मतदानाची घोषणा केली असली तरी, या निवडणुकांवरून राजकीय वातावरण आतापासूनच तापले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मतदार यादीतील गोंधळावरून राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. आयोगाचा कारभार ‘रिमोट कंट्रोल’द्वारे चालवला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

    काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

    महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी जशीच्या तशी स्वीकारणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. या डिजिटल युगात दुबार नावे स्पष्ट दिसत असतानाही ती वगळली जात नाहीत. जेव्हा या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या, तेव्हा आता आमच्याकडे अधिकार नाहीत, असे सांगून आयोग हात झटकत आहे”, असं थोरात म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाच्या या कारभाराची तुलना त्यांनी यांनी ‘पोरखेळा’शी केली असून, ब्राझील मॉडेलच्या गप्पा मारल्या जातात, पण अंमलबजावणी मात्र शून्य असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.Maharashtra TimesSangli News: ‘महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र, दोन दिवसांत जागावाटप…’; जयंत पाटील

    आयोगाची सारवासारव आणि स्पष्टीकरण

    दरम्यान, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची भारतीय निवडणूक आयोगाची (ECI) अद्ययावत मतदार यादी वापरली जाणार आहे. राजकीय पक्षांनी घेतलेल्या आक्षेपांवर समाधानकारक तोडगा काढल्याचा दावाही आयोगाने केला आहे. तसेच, निवडणुकीत पारदर्शकता रहावी यासाठी एकाच ठिकाणी ३ ते ५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण राबवण्यात येणार आहे, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

    निवडणूक कार्यक्रम

    राज्यातील मुदत संपलेल्या २७ आणि नव्याने निर्माण झालेल्या जालना व इचलकरंजी महापालिकांसाठी ही निवडणूक होत आहे.
    प्रक्रिया सुरूवात: २३ डिसेंबरपासून
    मतदान: १५ जानेवारी
    मतमोजणी: १६ जानेवारी

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा