राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारीला मतदान होईल. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मतदार यादीतील गोंधळावरून निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी जशीच्या तशी स्वीकारणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. या डिजिटल युगात दुबार नावे स्पष्ट दिसत असतानाही ती वगळली जात नाहीत. जेव्हा या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या, तेव्हा आता आमच्याकडे अधिकार नाहीत, असे सांगून आयोग हात झटकत आहे”, असं थोरात म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाच्या या कारभाराची तुलना त्यांनी यांनी ‘पोरखेळा’शी केली असून, ब्राझील मॉडेलच्या गप्पा मारल्या जातात, पण अंमलबजावणी मात्र शून्य असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.
Sangli News: ‘महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र, दोन दिवसांत जागावाटप…’; जयंत पाटील
आयोगाची सारवासारव आणि स्पष्टीकरण
दरम्यान, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची भारतीय निवडणूक आयोगाची (ECI) अद्ययावत मतदार यादी वापरली जाणार आहे. राजकीय पक्षांनी घेतलेल्या आक्षेपांवर समाधानकारक तोडगा काढल्याचा दावाही आयोगाने केला आहे. तसेच, निवडणुकीत पारदर्शकता रहावी यासाठी एकाच ठिकाणी ३ ते ५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण राबवण्यात येणार आहे, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
निवडणूक कार्यक्रम
राज्यातील मुदत संपलेल्या २७ आणि नव्याने निर्माण झालेल्या जालना व इचलकरंजी महापालिकांसाठी ही निवडणूक होत आहे.
प्रक्रिया सुरूवात: २३ डिसेंबरपासून
मतदान: १५ जानेवारी
मतमोजणी: १६ जानेवारी
