Badlapur Neerja Ambekar Murder : बदलापूरमधील काँग्रेसच्या महिला नेत्या नीरजा आंबेकर यांच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनं पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
आरोपीनं नेमकं काय काय सांगितलं?
बदलापूरमध्ये निवडणुकीच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी एका तरुणावर हल्ला झाला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश गज्जल करीत होते. चौकशीदरम्यान ऋषिकेशने एक मोठा खुलासा केला. पोलिसांनी त्याला विचारलं की, ‘तू अजून काय काय केलं आहे’, त्यावेळी तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने सांगितलं की, ‘3 वर्षापूर्वी बदलापूरमधील काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा मृत्यू झाला होता. तो मृत्यू नसून ती हत्या होती. हा मृत्यू आकस्मिक झाल्याचं दाखविण्यात आलं होतं.’ या प्रकरणात त्यावेळी एडीआर दाखल होते. या संपूर्ण प्रकरणात पुढे काही सुगावा मिळत नव्हता. तसेच कोणाचा काही आरोप देखील नव्हता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी तिथेच थांबवण्यात आली. मात्र, त्या मृत्यूचं खरं कारण आता समोर आलं आहे.
हाय-प्रोफाइल सोसायटीत काही दिवसांची नोकरी, पण मोठा डाव! मोलकरणीनं साडेतीन कोटींची चोरी केली
पोलिसांनी काय सांगितलं?
‘नीरजा आंबेरकर यांचा मृत्यू नैसर्गिक का दाखवला गेला. पती रुपेश आंबेकर याने नीरजा यांची हत्या त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने केली होती. 2022 मध्ये रुपेश आंबेरकर, चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि ऋषिकेशला घेऊन घरी गेला होता. त्याआधी त्याने घराच्या किचनमध्ये गोणीत साप आणून ठेवला होता. पत्नीच्या पायाची मालिश करण्याच्या बहाण्याने नीरजा यांना हॉलमध्ये झोपविले होते. त्यांच्यापैकी एकाने नीरजा यांच्या पायाला मालिश करण्यास सुरुवात केली. चेतन हा सर्पमित्र असल्यानं किचनमध्ये गोणीत ठेवलेला साप काढून ऋषिकेश चाळके याच्या हातात दिला’.
Kalyan News: धूर, गोंधळ आणि ट्रॅफिक जाम! कल्याण रेल्वे परिसरात आगीने खळबळ, नेमकं काय घडलं?
त्यानंतर ऋषिकेश चाळके याने हॉलमध्ये झोपलेल्या आणि नीरजा यांच्या पाठीवर रुपेश आंबेकर बसलेला असताना नीरजा यांच्या डाव्या घोट्याजवळ तीन वेळा सर्पदंश करुन जीवे ठार मारलं होतं. याचा उलगडा झाल्यानंतर नीरजा यांच्या हत्येच्या बातमीला वाचा फुटली आहे. याप्रकरणी आरोपी कुणाल चौधरी, रुपेश आंबेकर, चेतन दुधाने आणि ऋषिकेश चाळके यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात नीरजा यांच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची देखील चौकशी केली जाणार आहे’, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
