• Sun. Mar 8th, 2026
    Badlapur Crime : अटक झाली हल्ल्याच्या गुन्ह्यात, कबुली दिली 3 वर्षापूर्वी केलेल्या कांडाची; नीरजा आंबेकरांच्या मृत्यूचं धक्कादायक वास्तव कसं समोर आलं?

    Badlapur Neerja Ambekar Murder : बदलापूरमधील काँग्रेसच्या महिला नेत्या नीरजा आंबेकर यांच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनं पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.

    काँग्रेस नेत्या नीरजा आंबेकर सर्पदंश हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे (बदलापूर) : बदलापूरात काही दिवसांपूर्वी एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीने असा काही धक्कादायक खुलासा केला की, त्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. सुमारे 3 वर्षापूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा मृत्यू झाला होता. तो मृत्यू नव्हता तर ती हत्या होती. हत्या करणारा तिचा व्यावसायिक पती रुपेश आंबेकर हा होता. त्याने सर्पदंश देऊन त्याच्या पत्नीची म्हणजे नीरजा आंबेकर यांची तीन साथीदारांसोबत हत्या केली होती. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी चौघांना अटक केलेली आहे. इतकेच नाही तर नीरजा आंबेरकर यांच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची देखील चौकशी आता होणार आहे.

    आरोपीनं नेमकं काय काय सांगितलं?

    बदलापूरमध्ये निवडणुकीच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी एका तरुणावर हल्ला झाला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश गज्जल करीत होते. चौकशीदरम्यान ऋषिकेशने एक मोठा खुलासा केला. पोलिसांनी त्याला विचारलं की, ‘तू अजून काय काय केलं आहे’, त्यावेळी तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने सांगितलं की, ‘3 वर्षापूर्वी बदलापूरमधील काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा मृत्यू झाला होता. तो मृत्यू नसून ती हत्या होती. हा मृत्यू आकस्मिक झाल्याचं दाखविण्यात आलं होतं.’ या प्रकरणात त्यावेळी एडीआर दाखल होते. या संपूर्ण प्रकरणात पुढे काही सुगावा मिळत नव्हता. तसेच कोणाचा काही आरोप देखील नव्हता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी तिथेच थांबवण्यात आली. मात्र, त्या मृत्यूचं खरं कारण आता समोर आलं आहे.

    Maharashtra Timesहाय-प्रोफाइल सोसायटीत काही दिवसांची नोकरी, पण मोठा डाव! मोलकरणीनं साडेतीन कोटींची चोरी केली

    पोलिसांनी काय सांगितलं?

    ‘नीरजा आंबेरकर यांचा मृत्यू नैसर्गिक का दाखवला गेला. पती रुपेश आंबेकर याने नीरजा यांची हत्या त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने केली होती. 2022 मध्ये रुपेश आंबेरकर, चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि ऋषिकेशला घेऊन घरी गेला होता. त्याआधी त्याने घराच्या किचनमध्ये गोणीत साप आणून ठेवला होता. पत्नीच्या पायाची मालिश करण्याच्या बहाण्याने नीरजा यांना हॉलमध्ये झोपविले होते. त्यांच्यापैकी एकाने नीरजा यांच्या पायाला मालिश करण्यास सुरुवात केली. चेतन हा सर्पमित्र असल्यानं किचनमध्ये गोणीत ठेवलेला साप काढून ऋषिकेश चाळके याच्या हातात दिला’.

    Maharashtra TimesKalyan News: धूर, गोंधळ आणि ट्रॅफिक जाम! कल्याण रेल्वे परिसरात आगीने खळबळ, नेमकं काय घडलं?

    त्यानंतर ऋषिकेश चाळके याने हॉलमध्ये झोपलेल्या आणि नीरजा यांच्या पाठीवर रुपेश आंबेकर बसलेला असताना नीरजा यांच्या डाव्या घोट्याजवळ तीन वेळा सर्पदंश करुन जीवे ठार मारलं होतं. याचा उलगडा झाल्यानंतर नीरजा यांच्या हत्येच्या बातमीला वाचा फुटली आहे. याप्रकरणी आरोपी कुणाल चौधरी, रुपेश आंबेकर, चेतन दुधाने आणि ऋषिकेश चाळके यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात नीरजा यांच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची देखील चौकशी केली जाणार आहे’, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा