• Fri. Mar 6th, 2026
    Raigad Crime : पोलीस खात्यात कोट्यावधींचा घोटाळा? पोलीस अधीक्षक कार्यालयातच भ्रष्टाचार केल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

    Raigad Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यातल्या त्यात भ्रष्टाचाराचं प्रमाण देखील आता वाढताना दिसत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

    रायगड पोलीस अधिक्षक कार्यालय घोटाळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लेखा शाखेत भ्रष्टाचाराचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. आरोपी राजेश राम जाधव, कनिष्ठ श्रेणी लिपीक, यांनी सन 2021 पासून चाललेल्या त्यांच्या नेमणुकीत शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार केला असल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची रक्कम एकूण अंदाजे 1 कोटी 78 लाख 29 हजार 300 रुपये आहे. ज्यामध्ये आरोपी यांची पत्नी रिया राजेश जाधव देखील सामील असल्याचं फिर्यादीत नमूद आहे.

    शासकीय निधीचा अपहार

    फिर्यादी संदिप सखाराम जाधव यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ‘राजेश राम जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांचे दरमहाचे मानधन कोषागारातून मंजुरी घेऊन प्रत्यक्ष हजर नसलेल्या पोलीस पाटील यांची बनावट नावे तयार केली. त्यानुसार बनावट देयके कोषागारातून पास करून स्वतःच्या किंवा इतर व्यक्तीच्या बँक खात्यावर जमा केली. त्याचबरोबर, आरोपी यांची पत्नी रिया राजेश जाधव यांनी देखील पोलीस पाटील नसतानाही त्यांच्या नावाचा खोटा दाखला बनवून अंदाजे 1 कोटी 5 लाख 96 हजार 800 रुपये कोषागारातून पारित करून घेतल्याचा आरोप आहे. यामुळे या प्रकरणात एकूण शासकीय निधीचा अपहार झाला आहे’, असा गंभीर आरोप फिर्यादीकडून करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesAkola Crime: लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेचा मृत्यू, बॉयफ्रेंडनेच संपवलं, म्हणाला – ती मला… अकोला हादरलं

    विश्वासार्हतेवर गंभीर परिणाम

    फिर्यादीत असंही नमूद करण्यात आलं आहे की, ‘राजेश राम जाधव यांनी काही पोलीस पाटील यांचे नाव एकाहून अधिक वेळा देयक यादीत नोंदवून, त्यांच्या खात्यावर मानधन जमा करून शासकीय निधीचा स्वेच्छेचा लाभ घेतल्याचा आरोप आहे. यामुळे पोलीस खात्याच्या विश्वासार्हतेवर गंभीर परिणाम झाला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 247/2025 भा.न्या.सं. कलम 316(5), 318(2), 318(4), 336(3), 337, 338, 339, 344, 3(5) प्रमाणे नोंदवण्यात आला असून, अधिक तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर साळे करीत आहेत.

    प्रकरणामुळे मोठा गदारोळ

    स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस विभागाच्या कर्मचारी यांच्यात या प्रकरणामुळे मोठा गदारोळ उभा राहिला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. भ्रष्टाचाराचा हा प्रकार केवळ आर्थिक फसवणूकपुरताच मर्यादित नाही, तर पोलीस प्रशासनाच्या प्रतिष्ठा आणि जनतेच्या विश्वासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. स्थानिकांचं म्हणणं आहे की, ‘जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस खात्यातच अशा प्रकारचा घोटाळा झाला, तर प्रशासनाने तात्काळ जबाबदारांवर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांचा विश्वास कायम राखणं कठीण होईल.’

    Maharashtra TimesRatnagiri News: बड्या उद्योजकावर ई़डीची धाड, कंपनीबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त, रत्नागिरीत अनेकांची झोप उडाली

    पोलीस प्रशासन काय म्हणालं?

    दरम्यान, पोलीस विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून संबंधित खात्यांची तांत्रिक चौकशी केली जात असल्याची अधिकृत माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे. आता प्रशासनाची आणि पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हे प्रकरण पुढील काही दिवसांमध्ये पोलीस खात्यातील घोटाळ्याचं सत्य उघड करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा