• Fri. Mar 6th, 2026
    Devendra Fadanvis: ‘कारवाई अटळ…’, पार्थ पवार मुंढवा जमीन प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान

    जिंतेद्र खापरे, नागपूर : मुंढवा जमीन प्रकरणात सरकार कुणालाही वाचवणार नाही. जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई होणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई आणि पुढील टप्प्यात होणाऱ्या कारवाईची सविस्तर माहिती उच्च न्यायालयास सादर केली जाईल, असे स्पष्ट विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले.

    मुंबई उच्च न्यायालयाने पार्थ पवारांवर अद्याप एफआयआर का दाखल झाला नाही, असा सवाल उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, न्यायालयाने नेमके काय निरीक्षण नोंदवले आहे, याची सविस्तर माहिती सादर करताना शासन न्यायालयाला योग्य उत्तर देईल. सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. दोषी कुणीही असो, त्याच्यावर कारवाई अटळ आहे. कोणालाही संरक्षण दिले जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मतभेद असल्याच्या चर्चांवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “महापालिका निवडणुकांच्या संदर्भात आम्ही पूर्णपणे एकत्र आहोत आणि एकत्रितच लढणार आहोत. आमच्यात कोणताही राडा किंवा रोडा नाही.” एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “एकनाथ शिंदे नेहमीच माझे कौतुक करतात आणि मीही त्यांचे कौतुक करतो. आम्ही दिलखुलास मित्र आहोत.”

    65 इंच उंची, 15 स्पर्धांचा विजेता आणि महागड्या गाड्यांपेक्षा जास्त किंमत ! महाराष्ट्रात दाखल झालेल्या घोड्याची चर्चा…

    अभिमन्यू पवार यांच्या वक्तव्यांबाबत झालेल्या वादावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका मांडली. अभिमन्यू पवार यांच्याबाबत ‘झापले’ असे म्हणणे चुकीचे आहे. कालच्या प्रकरणात त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवर आक्षेप घेतला नसून, अवैध दारूचा प्रश्न उपस्थित केला होता, जो योग्य मुद्दा आहे, आणि त्यावर माझा गैरसमज झाला होता. असे त्यांनी स्पष्ट केले.

    राज्यात वाढत असलेल्या बिबट्यांच्या वावराबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, “ नागपुरात आज बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांबद्दल आम्हाला सहवेदना आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात विविध भागांत बिबट्यांचा वावर वाढताना दिसत असून, वन विभागाने याबाबत व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत २२ बिबट्यांना पकडण्यात आले आहे. लवकरच रेस्क्यू सेंटरचे काम पूर्ण झाल्यावर बिबट्यांना सुरक्षितरीत्या पकडण्याची क्षमता आणखी वाढेल.” जंगलात जन्मलेल्यांपेक्षा शेतात जन्मलेले बिबटे शहराकडे अधिक येतात, असेही त्यांनी नमूद केले.

    नाना पटोले यांनी मंत्र्यांच्या निवासस्थानी ‘रवी भवन’बाबत केलेल्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, बहुतेक मंत्री रवी भवनातच वास्तव्यास आहेत. रवी भवन गरीबखाना नाही. नानाभाऊंच्या काही मागण्या असतील, तर त्या योग्य मार्गाने सोडवता येतील.”

    ‘निवडणूक आयोगाचे काही निर्णय अयोग्य, मात्र…’

    नाना पटोले यांनी निवडणूक अधिकारीला निलंबित कारणाची मागणी केली त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणूक आयोगाचे काही निर्णय आम्हालाही मान्य नाहीत. विशेषतः निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय अयोग्य होता, यावर औरंगाबाद खंडपीठानेही स्पष्ट टीका केली आहे. मात्र, एखादा निर्णय चुकीचा वाटतो म्हणून आयोगाला पदावरून हटवण्याची मागणी करणे योग्य ठरणार नाही. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed