• Sat. Mar 7th, 2026
    Devendra Fadnavis: महापालिका निवडणुकीत ‘ब्रँड ठाकरे’चा फुगा फुटेल; CM फडणवीसांचा विरोधकांना टोला

    Devendra Fadnavis : जे कार्यकर्ते आमच्यासाठी काम करतात, प्रचार करतात, त्यांच्यासाठी आम्ही मते मागणे हे आमचे कर्तव्य होते. परंतु, विरोधी पक्षात याचाच विसर पडलेला दिसला, असे फडणवीस म्हणाले.

    devendra fadnavis news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना विसरले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवल्या, पण कार्यकर्त्यांना विरोधी पक्षांनी वाऱ्यावर सोडले. ते कार्यकर्त्यांसाठी मैदानातही उतरले नाहीत. कारण या निवडणुकीत हरलो तर मग आपल्याला महापालिका निवडणुकीत जो ‘ठाकरे ब्रँड’ दाखवायचा आहे, त्याचा फुगा फुटेल. त्यामुळे त्यांनी निवडणुकीत प्रचार करण्याची हिंमत दाखवली नाही’, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंवर नाव न घेता केली.

    नगरपालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. जे कार्यकर्ते आपल्यासाठी राबतात, त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय आम्ही तिघांनी घेतला. सर्व ठिकाणी युती शक्य नव्हती. जिथे शक्य होते तिथे युती केली. काही ठिकाणी वेगळे लढलो. मी मुख्यमंत्री असलो तरी दहा हजार लोकसंख्येच्या गावात जाऊन प्रचार करून आलो.
    Maharashtra Timesवर्षभरातच चांगले फर्निचर गोदामात; हिवाळी अधिवेशनात पैशांची उधळपट्टी, ४० कोटींचा अनावश्यक खर्च
    १८ विधेयके सादर होणार
    हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी अधिवेशनाबाबत माहिती दिली. ‘विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लहान-मोठी मिळून एकूण १८ विधेयके मांडली जाणार आहेत. या विधेयकावर चर्चा करून ती मंजूर केली जातील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी आहे. तरीही शनिवारी, रविवारी सुट्टीच्या दिवशी कामकाज केले जाणार आहे. अधिवेशनातून पळून जाण्याची सरकारची मानसिकता नाही’, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    इन्स्टाग्रामवर फोटो टाकतो
    मुख्यमंत्री आणि तुमच्यात बेबनाव असल्याबाबत विचारले असता शिंदे यांनी उपहासात्मक उत्तर दिले. ‘आता आम्ही रोज एकमेकांशी काय बोलतो त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो. नाही तर रोज फोटो काढून इन्स्टाग्रामवर टाकतो किंवा हास्यजत्रेतेच आम्ही जातो’, असेही ते म्हणाले.
    Maharashtra Times‘एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजप सत्तेत’, मंत्री शंभूराज देसाई यांचं मोठं वक्तव्य
    विरोधकांनी चिंतन करावे
    विरोधक विरोधी पक्षनेता पाहिजे म्हणतात; पण जनतेनेच त्यांना झिडकारले आहे. विरोधी पक्षनेता व्हावे, इतकेही संख्याबळ जनतेने त्यांना दिले नाही. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. आम्ही विरोधी पक्षाला कमी लेखत नाही. आम्ही त्यांचा सन्मान करतो; पण पुढील वेळी निदान विरोधी पक्षनेते पद मिळेल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत,’ असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी लगावला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा