• Wed. Mar 11th, 2026
    Uddhav Thackeray : ‘…तर उपमुख्यमंत्रीपदही रद्द करा’, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी

    मुंबई: शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नगरपालिका निवडणुका, मतदार याद्यांमधील त्रुटी, शेतकरी पॅकेज आणि विरोधी पक्षनेतेपद यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सध्याच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकांमध्ये हुकूमशाही वाढत असून ‘बूथ कॅप्चरींग’ ऐवजी आता ‘निवडणूकच कॅप्चर’ करण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

    मतदार याद्यांमधील घोळ इतका मोठा आहे की, सर्वोच्च न्यायालयाने यावर स्वतःहून लक्ष घालून लोकशाहीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या विषयावर त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत मतदार याद्यांमधील विसंगती दूर होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, असेही ते म्हणाले.

    मोठी बातमी: कर्जमाफीची तारीख निश्चित! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी दिलासा? कृषीमंत्री म्हणाले….

    ठाकरे यांनी राज्यात विरोधी पक्षनेतेपद अद्यापही रिक्त ठेवल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनापासून या पदाची मागणी असूनही एक वर्षानंतरही ते रिक्त आहे, हे इतिहासात प्रथमच घडत आहे, असे ते म्हणाले. सरकारला विरोधी पक्षनेतेपदाची भीती का वाटते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर कायद्याचा हवाला देऊन ही भूमिका घेतली जात असेल, तर उपमुख्यमंत्रीपदाचे कायदेशीर अस्तित्व नसल्याने तेही रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली.

    शेतकरी पॅकेजबाबत बोलताना ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्र्यांना केवळ उलट उत्तर देता येते, सरळ उत्तर देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारचे आभार मानताना, “केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्य सरकारची ‘सोंग उघडली’, त्यामुळे त्यांचे आभार,” असे उपहासाने सांगितले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. “ओला दुष्काळ ही संज्ञा नाही असे म्हटल्याने तो टाळला जाऊ शकत नाही,” असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे कधी येणार आणि प्रस्ताव सादर झाल्यानंतर प्रक्रिया किती वेळ घेणार, याबाबतही ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले.

    दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या “तीन पक्षांचे नाव वेगवेगळे पण मालक एकच” या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, “तिन्ही पक्षांचे नेते एकच आहेत, प्रत्यक्षात त्यांची बी-टीम आहे.” दिग्विजय सिंह यांच्या भेटीवर ठाकरेंनी खुलासा केला की, ही वैयक्तिक भेट होती. “आमची ओळख पूर्वीपासून आहे. ते बर्‍याच दिवसांनी मुंबईत आले होते, त्यामुळे भेट झाली,” असे त्यांनी सांगितले.

    सरकारवर कठोर टीका करताना ठाकरे यांनी लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला आणि आगामी निवडणुका पारदर्शक रित्या पार पडाव्यात, अशी मागणी केली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed