• Fri. Mar 13th, 2026
    नाशिकमध्ये ‘भूत’ निवडणूक लढवणार? नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांना द्यावा लागतोय जिवंत असल्याचा पुरावा

    नाशिकमधलं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इथे महापालिका निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. अनेक इच्छुक उमेदवार यासाठी तयारीला लागले देखील आहेत. पण एक चक्रावून टाकणारं प्रकरण समोर आलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : मतदारयाद्यांमधील घोळ हा सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरलेला आहे. असं असताना आता नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. इथे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे नाव हे चक्क कागदोपत्री मृत असल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. संबंधित इच्छुक उमेदवारांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली आहे. यावेळी अधिकाऱ्यांचं उत्तर ऐकून इच्छुक उमेदवारबी चक्रावले आहेत. आपण जिवंत आहात आणि तुमचं नाव यादीत समाविष्ट करुन घेण्यासाठी कोर्टाचा आदेश घेऊन या, असा आदेश संबंधिक अधिकाऱ्यांनी या इच्छुक उमेदवारांना दिल्याने हा विषय सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. कागदोपत्री मृत्यू झालेले हे उमेदवार खरंच निवडणूक इच्छूक असतील तर कागदोपत्री त्यांचे ‘भूत’ निवडणूक लढणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

    येणाऱ्या महानगर पालिकेतील काही इच्छुक उमेदवारांची नावेच मतदार यादीतून गायब झाले आहेत. त्याची त्यांनी चौकशी केली असता जिवंतपणी त्यांना मृत झाल्याचा दाखला देत या कारणास्तव आपले नाव मतदार यादीत नाल्याचे सांगण्यात आले आहे. या अजब कारभारामुळे जिवंत असलेले, पण कागदोपत्री मयत दाखवलेले इच्छुक उमेदवार आता उच्च न्यायालयाचा दरवाजा खटकावणार आहेत.

    नेमकं प्रकरण काय?

    नाशिकच्या सिडको परिसरातील विविध प्रभागातून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या अविनाश पाटील आणि उत्तम अर्जुन काळे उमेदवारांना चक्क कागदोपत्री मृत घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या इच्छुकांची नावे ही नवीन मतदार यादीतून वजा करण्यात आली आहेत. ही बाब लक्षात येताच सदर इच्छुकांनी मनपा विभागात जाऊन चौकशी केली. त्यानंतर तेथून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात जाण्यास सांगण्यात आले. त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे दालन गाठले आणि मतदार यादीतून नावे नसल्याबाबत विचारले.यावेळी त्याठिकाणी पडताळणी करून त्यांना जिवंतपणीचं मयत असल्याचा दाखला देण्यात आला आहे. हे ऐकून चक्रवलेल्या इच्छुकांनी आपण आपल्या समोर जिवंत असल्याचे सांगितले. पण समोर जिवंत उभ्या असलेल्या व्यक्तीला येथील अधिकारी यांनी “हायकोर्टातून मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याचे आदेश आणा. त्यानंतर आपले नाव या मतदारयादीत समाविष्ट केले जाईल”, असा सल्ला त्यांना देण्यात आला.

    निवडणूक विभागाच्या निरीक्षकाने, निवडणूक अधिकाऱ्याने अशा गोष्टींची चौकशी करणे आवश्यक असताना त्याप्रमाणे कुठलीही चौकशी करण्यात आली नाही. आगामी निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या किंवा विरोधकांनी बूथ लेवल ऑफिसर किंवा शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून हे कट कारस्थान केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

    केवळ मयत व्यक्तीशी आपल्या नावाचे साधर्म्य असून, कुठलीही पडताळणी किंवा चौकशी संबंधित निवडणूक विभागाच्या अधिकारी यांनी करायला हवी होती. पण तसं न झाल्यामुळे हा सर्व गौडबंगाल झाल्याचे देखील पीडित यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता आपल्याला हाय कोर्टात न्याय मिळेल हीच अपेक्षा पीडितांना आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा