• Wed. Jun 17th, 2026
    Nashik News: बिऱ्हाड आंदोलकांकडून अन्नत्याग; पाच दिवसांपासून सहा जणांचे बेमुदत आंदोलन

    Nashik Birhad Protest: विभागाकडून सुरू असलेले दुर्लक्ष, आंदोलकांना न्याय देण्याऐवजी फूट पाडण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या पाच दिवसांपासून सहा आंदोलकांनी अन्नाचा त्याग केला आहे.

    birhad protest news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: आदिवासी आश्रमशाळांतील बाह्यस्त्रोत भरतीविरोधात आदिवासी आयुक्तालयासमोर पावणेपाच महिन्यांपासून सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने अखेरीस आंदोलकांनी आता बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचे अस्र उपसले आहे.

    बिऱ्हाड आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे. राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील वर्ग ३ व ४ च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमी करून त्याऐवजी ठेकेदारांमार्फत १,७९१ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाह्यस्रोत भरतीप्रक्रियेला विरोध करत ती रद्द करण्याची मागणी करण्यासाठी ९ जुलैपासून आदिवासी आयुक्तालयासमोर बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे.
    Maharashtra Timesपैशांचाच बोलबाला! मताला 5 ते 25 हजारांचा ‘भाव’; त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थाआधीच मतदारांचं ‘चांगभलं’
    गेल्या पावणेपाच महिन्यांपासून सुरू असलेली मागणी आणि सरकारकडून त्याबद्दल कोणतीही आश्वासने न मिळाल्याने आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरेंसह अनेक नेते आणि मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊनही आंदोलनाचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात आंदोलकांनी उलगुलान मोर्चा काढत राज्यपालांचीही भेट घेतली होती. या आंदोलकांची राज्यपालांनी दखल घ्यावी, अशी मागणी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह विविध आमदारांनी केली होती. मात्र, तरीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलकांनी आता अन्नत्याग आंदोलनाचे अस्र उपसले आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
    Maharashtra Timesबसचालकाचा अंदाच चुकला, गाडी 20 फूट खाली कोसळली; नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचा साताऱ्यात भीषण अपघात
    न्यायाशिवाय माघार नाही
    बिऱ्हाड आंदोलनात सहभागी झालेल्या चारशे आंदोलकांपैकी तुळशीराम खोटरे, कुणाल नवाळी, योगेश खैरनार, ललितकुमार चौधरी, रामदास गावित, तुषार मानभाव अशा सहा आंदोलकांनी गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी या बेमुदत आंदोलनाचा पाचवा दिवस होता. त्यामुळे काहींची प्रकृती खालावत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. न्याय मिळाल्याशिवाय बेमुदत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा