Pune News : भरधाव बसने पदपथावरील पाच जणांना चिरडल्याने झालेल्या अपघातात दोन बहिणी आणि त्यांच्या भावाचा जागीच मृत्यू झाला.
अर्चना देवेंद्र प्रसाद (वय ९) आणि सूरज देवेंद्र प्रसाद (वय ६) आणि प्रिया देवेंद्र प्रसाद (वय १६) अशी अपघातात मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. अविनाश हरिदास चव्हाण (वय २६) आणि विमल राजू ओझरकर (वय ४०) या गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.
कसा झाला अपघात?
आयटी कर्मचार्यांना घेऊन वाकडच्या दिशेने जात असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. बस चालक नागनाथ राजाभाऊ गुजर (वय ३६, रा. भोसरी) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. या अपघातानंतर संतापलेल्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
देवेंद्र प्रसाद हिंजवडी येथे लाँड्रीचा व्यवसाय करतात. पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. उत्तर प्रदेशातील हे कुटुंब असून, अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. अपघातात त्यांनी मुलगा आणि दोन मुली गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिंजवडी परिसरात गेल्या सात महिन्यांत नऊ प्राणांतिक अपघात झाले असून, दहा नागरिकांचा यात बळी गेला आहे.
