• Fri. Mar 6th, 2026
    हिंजवडी आयटी पार्कमध्ये तीन सख्ख्या भावंडांना चिरडलं, मायबापाचं विश्व उद्ध्वस्त, मद्यधुंद बस चालकाला पादचाऱ्यांचा चोप

    Pune News : भरधाव बसने पदपथावरील पाच जणांना चिरडल्याने झालेल्या अपघातात दोन बहिणी आणि त्यांच्या भावाचा जागीच मृत्यू झाला.

    पुणे हिंजवडी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून, त्यात तीन सख्ख्या भावा-बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (एक डिसेंबर) सायंकाळी हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भरधाव बसने पदपथावरील पाच जणांना चिरडले. या अपघातात दोन बहिणी आणि त्यांच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर मद्यधुंद बस चालकाला नागरिकांनी चोप दिला; तसेच बसची तोडफोड केली.

    अर्चना देवेंद्र प्रसाद (वय ९) आणि सूरज देवेंद्र प्रसाद (वय ६) आणि प्रिया देवेंद्र प्रसाद (वय १६) अशी अपघातात मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. अविनाश हरिदास चव्हाण (वय २६) आणि विमल राजू ओझरकर (वय ४०) या गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.

    कसा झाला अपघात?

    आयटी कर्मचार्‍यांना घेऊन वाकडच्या दिशेने जात असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. बस चालक नागनाथ राजाभाऊ गुजर (वय ३६, रा. भोसरी) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

    परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. या अपघातानंतर संतापलेल्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

    देवेंद्र प्रसाद हिंजवडी येथे लाँड्रीचा व्यवसाय करतात. पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. उत्तर प्रदेशातील हे कुटुंब असून, अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. अपघातात त्यांनी मुलगा आणि दोन मुली गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिंजवडी परिसरात गेल्या सात महिन्यांत नऊ प्राणांतिक अपघात झाले असून, दहा नागरिकांचा यात बळी गेला आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा