• Fri. Mar 6th, 2026
    Nitesh Rane: निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकली, आता नितेश राणे संतापले; भावाला इशारा देत म्हणाले…

    Shivsena Nilesh Rane: सिंधुदुर्गमध्ये निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकून पैसे वाटपाचा आरोप केल्यानंतर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी हा वैयक्तिक व्यवसायाचा भाग असल्याचं सांगितलं असून शिवसेनेला इशाराही दिला आहे.

    निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकली, आता नितेश राणे संतापले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सिंधुदुर्ग: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी काल मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकून पैसे वाटपाचा आरोप केला. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर देत, हा वैयक्तिक व्यवसायाचा भाग असल्याचे स्पष्ट केलं असून निवडणूक आयोग आणि पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील, असं म्हटलं. तसंच निलेश राणे यांच्यावर हल्लाबोल करत शिवसेनेला इशाराही दिला आहे.

    निलेश राणे यांनी काल मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकली. मतदानाच्या तोंडावर भाजप कार्यकर्ते पैशांचे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. निलेश राणे यांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत भाजपवर हे आरोप केले. यावेळी त्यांनी भाजपचे विजय केनवडेकर यांच्या घरात टेबलवर ठेवलेली एक बॅग दाखवली. घरात पैशांनी भरलेल्या आणखी 3 ते 4 बॅगा असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

    या आरोपांना आता भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे म्हणाले की, “आम्ही राजकीय पक्षाचे सदस्य असलो तरी आमचे वैयक्तिक आयुष्य आणि व्यवसाय आहेत. आम्ही समाजकारण करून राजकारण करतो. विजय केनवडेकर अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून त्यांच्या घरात कॅश आढळली असेल तर मग यात काय चुकीचे आहे?” असा सवाल नितेश राणे यांनी निलेश राणेंना केला आहे.

    रवींद्र चव्हाणांवरील आरोपांना प्रत्युत्तर, शिवसेनेला इशारा

    रवींद्र चव्हाण हे पैसे घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देत नितेश राणे यांनी निलेश राणेंसह शिवसेनेला इशारा दिला आहे. “हमाम मे सब नंगे होते है. चव्हाण साहेबांवरील आरोप हा राजकीय आरोप आहे. त्याला राजकीय चष्म्यातूनच पाहिलं पाहिजं. उदय सामंत पण सिंधुदुर्गात येऊन गेले. ते सहज आलेले की सॅन्टाक्लॉज बनून आलेले असं आम्ही विचारू का? उदय सामंत यांच्या दौऱ्यावर आम्ही धिंगाणा घातल्यावर चालेल का?” असा गर्भित इशारा नितेश राणेंनी दिला आहे.

    दरम्यान, “भाजपला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरज नाही. आमच्याकडे मोदी साहेबांसारखे नेतृत्व आहे आणि फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत. आम्ही विकासावर आणि आमच्या सरकारच्या योजनांवर निवडणुका लढवत आहोत. या सगळ्या प्रकारावर राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस चौकशी करतील. ज्यांच्या घरी पैसे सापडले, त्यांच्या व्यवसायाची आणि पार्श्वभूमीची चौकशी केली जाईल. सर्व चौकशी निःपक्षपाती होईल. आता सर्व तक्रारींवर चौकशी होईल,” असंही नितेश राणे म्हणाले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा