• Sun. Jun 14th, 2026
    सर्वात मोठी बातमी! उज्ज्वला थिटे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, अनगर नगरपंचायतीचा तिढा सुटला

    अनगर पंचायतीच्या निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सोलापूर जिल्हा न्यायालयाने उज्ज्वला थिटे यांची याचिका फेटाळली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : राज्यात प्रकाशझोतात आलेल्या अनगर नगर पंचायतीचा तिढा अखेर सुटला आहे. ६८ वर्षांपासून बिनविरोध होत असलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत उज्ज्वला थिटे या विधवा महिलने थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. अनेक वर्षांपासून बिनविरोध होत असलेल्या अनगर नगर पंचायतीची निवडणूक यंदा लागणार, अशी चर्चा होती. उज्ज्वला थिटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून माजी आमदार राजन पाटील यांच्या सत्तेला आव्हान दिले होते.

    निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जाच्या छाननीत उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला होता. उज्ज्वला थिटे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात सोलापूर जिल्हा न्यायालयात अपील केले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रावैद्य यांनी उज्ज्वला थिटे यांची याचिका फेटाळली आहे.

    न्यायालयाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना जबरदस्त धक्का लागला आहे. बुधवारी दिवसभर उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. उज्ज्वला थिटे यांच्याकडून वकील दत्ता घोडके यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले.

    नेमकं काय-काय घडलं?

    अनगर नगर पंचायत निवडणूक ही महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत ठरली. या भागात भाजप नेते तथा माजी आमदार राजन पाटील या भागात ताकदवान नेते आहेत. ते या परिसरातील बडे प्रस्थ आहेत. या निवडणुकीत राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज केला होता.

    उज्जवला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून इथे वाद बघायला मिळाला. राजन पाटील आपल्याला अर्ज दाखल करु नये म्हणून दबाव टाकत असल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला होता. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपल्यापुढे अनेक अडचणी उभ्या केल्या, असा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला होता. या आरोपांनंतर उज्ज्वला थिटे यांनी शस्त्रधारी पोलिसांना घेऊन जात अर्ज दाखल केला होता. पण अर्जाच्या छाननीवेळी त्यांचा अर्ज बाद झाला. यामुळे ही निवडणूक बिनविरोध ठरली.

    प्राजक्ता पाटील यांच्या समोर दुसरा कुठलाही उमेदवार नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच राजन पाटील यांच्या समर्थक असलेल्या 17 नगरसेवकांची त्याआधीच बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर नगराध्यक्षपदाची निवड झाली. यानंतर उज्ज्वला थिटे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण त्यांची याचिका कोर्टाने आता फेटाळली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा