• Sun. Jun 14th, 2026
    नागपूर काँग्रेसमध्ये काय चाललंय? आता थेट काँग्रेस हायकमांडला पत्र, ऐन निवडणुकीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

    नागपूर काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल दिसत नाही. काँग्रेस हा खरंतर देशातला मोठा पक्ष आहे. नागपुरात काँग्रेसची ताकद आहे. पण सध्या नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चर्चेला कारण ठरताना दिसत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया वेग घेत असताना नागपूर काँग्रेसमध्ये संतप्त असंतोष उफाळून आला आहे. उमेदवारी आणि पक्षातील नेतृत्वशैलीवरून नाराजी वाढत चालली आहे. पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकामागून एक बाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे, हा संघर्ष फक्त अंतर्गत गटबाजीपुरता मर्यादित नसून थेट नेतृत्वाविरोधात बंडाचे स्वर जोर धरताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत नरखेड तालुका अध्यक्ष सुदर्शन नवघरे यांसह अनेक महत्त्वाचे स्थानिक नेते भाजपमध्ये दाखल झाले. वाडी शहरातील तब्बल 40 पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे देत काँग्रेसची अडचण वाढवली आहे. तर राजा तिडके, चंद्रपाल चौकसे, शहजाहा अंसारी आदी नेत्यांनीही पक्ष सोडण्याचा मार्ग अवलंबला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, गटबाजी आणि पक्षांतर्गत वरिष्ठांकडून होणारे दुर्लक्ष हे या पक्षांतरांचे प्रमुख कारण आहे.

    या नाराजीची सर्वाधिक झळ नागपूर जिल्हा काँग्रेसला बसत आहे. बुटीबोरी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांचे ‘एबी फॉर्म’ थांबवून पंजा चिन्हच गायब करण्याचा आरोप आघाडीच्या नेतृत्वावर होत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना दुर्लक्षित करून बाहेरून आणलेल्या, काहींना तर भाजपच्या पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

    याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी महासचिव मुजीब पठान, माजी जिल्हाध्यक्ष बाबा अष्टेकर आणि इतर स्थानिक नेत्यांनी थेट हायकमांडकडे पत्रव्यवहार करत कारवाईची मागणी केली आहे. “स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद एका गटाच्या हातात केंद्रीत होत असून, त्याचे राजकीय दुष्परिणाम निवडणुकांमध्ये दिसणारच”, असे कार्यकर्ते खुलेआम बोलू लागले आहेत.

    सध्याच्या परिस्थितीचा परिणाम भाजपच्या रणनीतीवर स्पष्ट दिसू लागला आहे. काँग्रेसमधून नाराज झालेले नेते आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला अनेक जागांवर नवीन भक्कम चेहरा आणि संघटन बळ मिळत आहे. नगरपरिषदांसह जिल्हा पातळीवरील निवडणूक समीकरणांमध्ये भाजपचा फायदा निश्चित मानला जात आहे.

    काँग्रेसमध्ये वाढत असलेले पलायन निवडणूक प्रचाराच्या निर्णायक काळात झाल्याने चिंता अधिकच वाढली आहे. संघटनशक्ती कमी झाल्यामुळे प्रचारयोजना विस्कटण्याची भीती व्यक्त केली जाते. स्थानिक पातळीवरील काँग्रेसचे मनोबल कोसळताना दिसत असून, ही परिस्थिती थांबवण्यासाठी हायकमांडने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज होत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा