Pune Vadgaon Murder Case : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढलं असून सिंहगड कॉलेजजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून आणि कोयत्याने वार करून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रात्री उशिरा किंवा पहाटे हा खून झाला असावा असा अंदाज आहे.
पार्किंगमध्ये एकटाच बसलेला
सिंहगड रोड भागातील मिनाक्षीपुरम परिसरातील ‘कृष्णकुंज’ इमारतीच्या पार्किंगमधे दुपारच्या वेळेस तौकीर शेख एकटाच बसलेला होता. त्याचवेळी पाच जणांचे टोळके अचानक येथे दाखल झाले. कोणतीही चर्चा न करता त्यांनी हातातील कोयत्याने तौकीरवर जोरदार हल्ला सुरू केला. काही क्षणांतच तौकीर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मात्र हल्लेखोर एवढ्यावरचं थांबले नाही. त्यांनी मोठा दगड उचलून तौकीरवर वारंवार दगडाने प्रहार करून त्याचा जीव घेतला. हत्येनंतर हे सर्व आरोपी काही क्षणांत घटनास्थळावरून फरार झाले.
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! राज्य सरकारचा मोठा निर्णय
दोन आरोपी अल्पवयीन
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. प्राथमिक तपासात हल्लेखोरांपैकी दोन जण अल्पवयीन असल्याच समोर आलं आहे. पूर्ववैमनस्य, पूर्वीचे भांडण, टोळीयुद्ध किंवा अन्य कोणते कारण यामागे आहेत का?, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके नेमली असून ते हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरु
हल्लेखोरांनी वापरलेले शस्त्र, मोटारसायकली, तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. तौकीर शेखच्या पूर्वीच्या गुन्हेगारी हालचाली व त्याचे संबंध कोणत्या टोळीशी होते का हे तपासून खुनाच्या संभाव्य कारणांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, हा अत्यंत नियोजित आणि क्रूर हल्ला असून आरोपी लवकरच गजाआड केले जातील.
Solapur News : भाजपने निवडणुकीआधी गुलाल उधळला; सोलापुरातील ‘ही’ नगरपंचायत बिनविरोध, 17 उमेदवार एकतर्फी विजयी
दरम्यान, अलीकडच्या काही महिन्यांत पुण्यात, विशेषतः सिंहगड रस्ता, कात्रज, हडपसर, येरवडा, वारजे, कोथरूड, दांडेकर पूल या भागांत गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढताना दिसत आहे. टोळ्यांमधील वाद, वैयक्तिक राग, नशेचे व्यसन, स्थानिक वर्चस्वासाठीची लढाई या सर्व कारणांमुळे तरुणांमध्ये हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. पोलिसांनी वारंवार टोळ्यांवर आणि त्यांच्या सदस्यांवर कारवाई करूनही, काही गट पुन्हा सक्रिय होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. दुपारी भर दिवसा झालेल्या या खुनानंतर रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी जोर धरत आहे.

