• Sat. Mar 14th, 2026

    Pune Accident: पुणेकरांना लाज आणणारा व्हिडिओ समोर; अपघातानंतर कुटुंब आगीत जळत होतं, काहीजण निर्लज्जपणे सोनं लुटत होते!

    Pune Accident: पुणेकरांना लाज आणणारा व्हिडिओ समोर; अपघातानंतर कुटुंब आगीत जळत होतं, काहीजण निर्लज्जपणे सोनं लुटत होते!

    Pune News: नवले पुलाजवळ झालेल्या विचित्र अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर अपघातस्थळी मदतीऐवजी काही नागरिकांनी लुटालूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे आणि सोन्याचे दागिने गोळा करण्यासाठी गर्दी जमली होती. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    पुणे अपघात व्हिडिओ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात असताना या अपघातातील मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर आला. एका बाजूला कुटुंब होरपळून मृत्युमुखी पडले असताना दुसरीकडे काही नागरिकांनी अपघातस्थळी लुटालूट करण्यासाठी गर्दी केली होती. या घटनेने काही पुणेकरांच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवलं आहे.

    अपघातानंतर एका बाजूला लोक मदतीची अपेक्षा करत होते, तर दुसरीकडे काही जणांनी लुटालूट सुरू केली. दोन ट्रकच्या भीषण अपघातानंतर पैसे आणि सोन्याचे दागिने लुटण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. पुण्यातील अपघातानंतर वाहनाला आग लागल्याने एका लहान चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला होता, तर कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला होता. समाजात हळहळ व्यक्त केली जात असताना काही असंवेदनशील व्यक्तींनी मात्र सोने आणि पैसे गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली होती. यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची संवेदनशीलता हरवत चालली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    ट्रकमालकासह चालकावर गुन्हा दाखल

    नवले पुलाजवळ झालेल्या अपघातात आठ जणांचा बळी गेला. या अपघातानंतर लागलेल्या आगीत ट्रकचालक आणि मदतनीस यांचा होरपळून मृत्यू झाला. हे दोघे राजस्थानचे रहिवासी होते. त्यांच्यासह ट्रक मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात ट्रकचालक आणि क्लीनरचा गंभीर भाजल्याने मृत्यू झाला असून, ताहीर खान होरपळल्याने गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिघांविरोधात सदोष मनुष्यवध, सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे, इतरांचे जीवित धोक्यात आणण्याची कृती करणे आदी भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

    वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न

    पुणे-मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे-रावेत पट्ट्यात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आता लवकरच दूर होणार आहे. या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने, तसेच हिंजवडी, भोसरी, चाकण एमआयडीसीमधील वाहनांचाही ताण असल्याने, वाहनांचा वेग ताशी २० किमीपेक्षा कमी झाला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून प्रशासनाने ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ (Elevated Corridor) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक प्रकारचा उड्डाणपूलच आहे. या प्रकल्पामुळे वाहनांचा वेग ताशी ८० किमीपर्यंत वाढेल, इंधन वाचेल आणि प्रदूषणही कमी होईल.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा