• Sat. Mar 7th, 2026

    Maharashtra Weather: महाराष्ट्र आणखी गारठणार! आजपासून या जिल्ह्यांमध्ये थंडीचा लाट पसरणार, हवामान विभागाचा ताजा अलर्ट

    Maharashtra Weather: महाराष्ट्र आणखी गारठणार! आजपासून या जिल्ह्यांमध्ये थंडीचा लाट पसरणार, हवामान विभागाचा ताजा अलर्ट

    IMD Weather Alert: महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असून उत्तर मध्य महाराष्ट्रात आजपासून तर मराठवाड्यात उद्यापासून अधिक थंडी जाणवेल. जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. तसंच राजधानी मुंबईतही किमान तापमान खाली येण्याची शक्यता आहे.

    महाराष्ट्र आणखी गारठणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: नोव्हेंबर महिन्यात उत्तर राजस्थान व मध्य प्रदेशानंतर आता महाराष्ट्रातही थंडीच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आज, शनिवारपासून आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये उद्या रविवारपासून थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा असून मुंबईत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये किमान तापमान आणखी खाली घसरण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

    हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ते सोमवार या कालावधीत जळगाव जिल्ह्यात थंडीच्या लाटेची शक्यता असून नाशिक जिल्ह्यात रविवार, सोमवारी, धुळे व नंदुरबारमध्ये सोमवारी थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी होणाऱ्या तापमानाचा परिणाम उत्तर कोकणातील जिल्ह्यांवरही होतो. १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान तापमान १७ अंशांपर्यंत खाली येईल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

    जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं. जळगाव येथे सरासरीपेक्षा ५.८ अंशांनी कमी, ९.५ अंश एवढे किमान तापमान नोंदवले गेले. नाशिक जिल्ह्यात १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले असून उत्तर मध्य महाराष्ट्रातील तापमानाचा परिणाम उत्तर कोकणावर होत असल्याचं शुक्रवारीही समोर आले. शुक्रवारी डहाणू येथे किमान तापमान सरासरीपेक्षा ४.४ अंशांनी खाली उतरलं. डहाणूमध्ये १७.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर दुसरीकडे मुंबईत सांताक्रूझ इथं १८.४ व कुलाब्यामध्ये २२.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलं. सांताक्रूझमधील किमान तापमान सरासरीपेक्षा ३.२ अंशांनी, तर कुलाबा येथे सरासरीपेक्षा १.१ अंशांनी खाली उतरले होते.

    ‘कमाल’ पारा कायम

    ईशान्येकडील वाऱ्याचा प्रभाव अजूनही दिवसाच्या तापमानावर जाणवत नसल्याने रत्नागिरीत कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. कुलाबा येथे ३३.८ आणि सांताक्रूझ येथे ३३.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान होतं. जळगाावात किमान तापमान १० अंशांखाली गेलं असलं तरी, कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस होतं. सध्या तरी कमाल तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही.

    दरम्यान, सध्या ईशान्येकडून येणारे वारे दिवसाच्या तापमानावर फारसा परिणाम करत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यात दिवसाचे तापमान ३४.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. मुंबईतील कुलाबा येथेही तापमान ३३.८ अंश सेल्सिअस होते, तर सांताक्रूझमध्ये ३३.३ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा