Pune Accident News: पुण्यात मुंबई-बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याजवळ गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. एका मालवाहू ट्रकने आठ ते दहा वाहनांना धडक दिली. या अपघातात एका कारने पेट घेतला आणि आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. बचावकार्य सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास घडला. सातारा येथून मुंबईकडे निघालेला एक कंटेनर (मालवाहू ट्रक) स्वामीनारायण मंदिर येथील तीव्र उतारावर आला असता, चालकाचं नियंत्रण सुटलं आणि आजूबाजूच्या वाहनांना धडक देत हा कंटेनर पुढे जाऊ लागला. या धडकेत आठ ते दहा वाहने चिरडली गेली.
या अपघातात एका कारला ट्रकने जोरदार धडक दिली. ती कार ट्रकच्या समोरच्या भागात अडकली आणि फरफटत गेली. पुढे जाऊन याच ट्रकने दुसऱ्या एका ट्रकला धडक दिली. दोन ट्रकच्या मध्ये अडकलेल्या कारने पेट घेतला आणि आगीचा भडका उडाला. तिन्ही जळती वाहने काही अंतर पुढे जाऊन थांबली. अपघातातील दोन्ही ट्रक राजस्थान पासिंगचे होते, तर जळालेल्या चारचाकी वाहनाची माहिती अद्याप मिळालेली नाही.
दरम्यान, पुण्यातील या भीषण अपघातात कारमधील पाच प्रवाशांसह कंटेनर चालक आणि क्लिनरचाही मृत्यू झाला. एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन महिला, एक बाळ आणि चार पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय 15 ते 20 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवून बचावकार्य सुरू केले. वाहने एकमेकांमध्ये इतकी अडकली होती की, त्यांना बाजूला करण्यासाठी कटर आणि क्रेनचा वापर करावा लागला. घटनास्थळी दहा रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. या दुर्दैवे घटनेनं राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

