• Mon. Mar 16th, 2026

    Maharashtra Weather: राज्यात थंडीची लाट! मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पारा घसरला; पुढील काही दिवस कशी असणार स्थिती?

    Maharashtra Weather: राज्यात थंडीची लाट! मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पारा घसरला; पुढील काही दिवस कशी असणार स्थिती?

    Maharashtra Cold Wave: राज्यात पुढील तीन ते चार दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असून मुंबईत या मोसमातील सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं आहे. उत्तरेकडील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असून किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

    राज्यात थंडीची लाट! मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पारा घसरला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: राज्यात थंडीचा कडाका आणखी तीन ते चार दिवस कायम राहणार असून पहाटे गारवा आणि दिवसा वाढलेले तापमान अशी स्थिती पाहायला मिळत आहे. मुंबईत बुधवारी या मोसमातील सर्वात कमी तापमान १८.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. जळगावमध्ये किमान तापमान ९.१ अंश सेल्सिअस होते, जे सरासरीपेक्षा ६.२ अंशांनी कमी होते. कमाल आणि किमान तापमानातील मोठी तफावत नागरिकांना जाणवत आहे.

    मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. जळगावमध्ये बुधवारी किमान तापमान ९.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल ६.२ अंशांनी कमी होते. याच शहरात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस होते. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सुमारे २१ अंशांचा फरक दिसून आला. मुंबईतही थंडीचा कडाका जाणवला. बुधवारी मुंबईत या मोसमातील सर्वात कमी तापमान १८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नाशिकमध्ये किमान तापमान १०.६ अंश सेल्सिअस होते. पुणे, लोहगाव, अहिल्यानगर, मालेगाव, नाशिक आणि सांगली यांसारख्या शहरांमध्येही कमाल आणि किमान तापमानात १५ ते १६ अंशांहून अधिक फरक होता.

    बीडमध्ये किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअस होते, जे सरासरीपेक्षा ५.३ अंशांनी कमी आहे. छत्रपती संभाजीनगर आणि परभणी येथे किमान तापमान अनुक्रमे १३ आणि १३.४ अंश सेल्सिअस होते. या दोन्ही ठिकाणी कमाल तापमान ३१.२ अंश सेल्सिअस होते. विदर्भातही थंडीचा प्रभाव दिसून आला. यवतमाळमध्ये किमान तापमान १०.६ अंश सेल्सिअस होते, जे सरासरीपेक्षा सात अंशांनी खाली उतरले होते. गोंदियातही किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअस होते. यवतमाळमध्ये कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सिअस होते, तर गोंदियात ते २८.८ अंश सेल्सिअस होते. ही थंडीची लाट पुढील तीन ते चार दिवस अशीच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

    उत्तरेकडील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट कायम असून, किमान तापमानात २ ते ८ अंशांची मोठी घट झाली आहे. धुळे येथे हंगामातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर निफाड येथे पारा ९ अंशांपर्यंत घसरला आहे. राज्याच्या उत्तरेकडे गारठा अधिक असून, पहाटे धुक्यासह दव पडत आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांत मात्र तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. आज राज्याच्या किमान तापमानात घट आणि थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

    देशभरात हुडहुडी

    केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि प्रामुख्यानं काश्मीरच्या खोऱ्यासह उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. हिमाचलच्या मैदानी क्षेत्रांमध्ये आकाश निरभ्र असलं तरीही लाहौल, स्पितीसारख्या दुर्गम भागांमध्ये मात्र पारा उणे २ अंशांपर्यंत खाली येणार आहे. उत्तर भारताकडील अतीव उत्तरेस असणाऱ्या या प्रांतांमध्ये वाढणारा थंडीच्या कडाक्याचा परिणामामुळे महाराष्ट्रही गारठताना दिसत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा