• Tue. Jun 16th, 2026
    ‘हात हलवीत आलात आणि हात हलवीत गेलात’; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पटलवार, मराठवाड्यातून बोचरी टीका

    Dcm Eknath shinde on uddhav thackeray: उद्धवर ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर एकनाथ शिंदेंनी घणाघात केला आहे. ते म्हणाले मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, एक बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाहीत. फुकटचा ताठा अन् नाव उबाठा अशा शब्दांत मराठवाड्यातूनच जोरदार खोचक प्रत्युत्तर दिले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    धनाजी चव्हाण, परभणी: नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केला आणि दौरा करताना हे सरकार दगाबाज आहे, असे म्हणत महायुती सरकारवर कडाडून टीका केली. आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेचा चांगलाच समाचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तुम्ही आम्हाला दगाबाज म्हणता मग 2019 मध्ये महायुतीसोबत मिळून विधानसभा निवडणुका लढल्या आणि त्यानंतर तुम्ही भाजपला आणि हिंदुत्वाला सोडून काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली, तेव्हा तुम्ही दगाबाजी केली नाही का? तुम्ही सर्वात मोठे दगाबाज आहात, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला आहे.

    दौऱ्याच्या वेळी तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना म्हणालात की माझ्याकडे आता सत्ता नाही. मी काहीच देऊ शकत नाही. पण जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा तुम्ही घराबाहेर निघाला नाहीत आणि कसल्याही प्रकारची शेतकऱ्यांना मदतही केली नाहीत. सामान्य माणूसही दुसऱ्याच्या घरी जर गेला तर साधा बिस्किट पुडा तरी घेऊन जातो, पण तुम्ही मात्र हात हलवीत आलात आणि हात हलवीत गेलात, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.

    Maharashtra Timesमहायुतीला धक्का! पवार काका-पुतणे एकत्र येणार; बहीण सुप्रिया सुळेंची साद, खुद्द अजित पवारांनीच…

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते. परभणीच्या महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात भव्य जाहीर सभा संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार सुरेश जाधव माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे जिल्हाध्यक्ष विशाल कदम लोकसभा संपर्कप्रमुख राजू कापसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

    पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे. याच सरकारने शेतकऱ्यांसाठी आपली तिजोरी पूर्णपणे खुली केली आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या. शेतकऱ्यांना विद्युत बिलामध्ये माफी देण्यात आली. त्याचबरोबर आत्ताच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, पण या संकटातही महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. 31 हजार कोटी रुपयांची पॅकेज याच सरकारने शेतकऱ्यांसाठी दिले. आता कर्जमाफीचा निर्णय देखील या सरकारने घेतला आहे. लवकरच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आम्ही करणार आहोत. त्यामुळे महायुतीचे सरकार हे देणारे आहे घेणारे नाही, असे म्हणत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे.

    दिल्ली येथे अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला आणि निष्पाप व्यक्तींचा जीव गेला. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, असे म्हणत देशातील सर्वच यंत्रणा ऍक्टिव्ह मोडवर आल्या असून लवकरच या बॉम्ब हल्ल्याच्या पाठीमागे असणाऱ्यांना पकडले जाईल. देशाचे गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेच्या पाठीमागे असणाऱ्यांना सोडणार नसल्याचे सांगितले आहे. आता आपला देश पूर्वीचा राहिला नाही, तर आतंकवाद्यांना जशास तसे उत्तर दिले जात आहे. यापूर्वीदेखील सिंदूर ऑपरेशन असो किंवा पहेलगाम हल्ला यामध्ये देशाने अशा घटना घडविणाऱ्यांना अचूक उत्तर दिले आहे, आता देखील दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

    त्याचबरोबर लाडकी बहीण योजना कदापिही बंद होणार नाही, असेदेखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित असलेल्या महिलांना सांगितले. कोणी काही जरी म्हणाले तरी ही योजना मी सुरू केली आहे आणि ती कदापी बंद होणार नाही, हा माझा शब्द आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर लाडक्या भावांसाठी देखील मी शब्द दिला होता आणि त्यांचा शब्द देखील मी लवकरच पूर्ण करणार असल्याची ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा