• Fri. Mar 13th, 2026

    Maharashtra Weather Alert: महाराष्ट्र गारठला! तापमान घसरल्याने राज्यभर हुडहुडी, सर्वाधिक थंडी कोणत्या जिल्ह्यामध्ये?

    Maharashtra Weather Alert: महाराष्ट्र गारठला! तापमान घसरल्याने राज्यभर हुडहुडी, सर्वाधिक थंडी कोणत्या जिल्ह्यामध्ये?

    Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रात तापमान घटत असल्याने थंडी वाढत चालली आहे. मुंबईसह कोकणात गुलाबी थंडीचा अनुभव येत असून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.

    महाराष्ट्र गारठला! तापमान घसरल्याने राज्यभर हुडहुडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून तापमानात सातत्याने घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह कोकणातही निरभ्र आकाश व गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आधीच कमी तापमान नोंदवले गेले असताना तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज आकाश प्रामुख्याने निरभ्र राहणार आहे. दिवसा उन्हाचा तडाखा जाणवेल, तर सकाळी आणि रात्री थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी आणखी वाढत असून, पुढील काही दिवसांत तापमान आणखी खाली जाऊ शकते.

    मुंबई आणि कोकण विभागात आज 12 नोव्हेंबर रोजी आकाश निरभ्र राहील. मुंबईत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही कोरडे आणि उबदार वातावरण कायम राहील. राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. काल सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये डहाणू येथे 32.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्याचे नीचांकी 8.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. जळगाव, निफाड येथे थंडीची लाट कायम असून मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, रत्नागिरी, नाशिक, परभणी, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गुलाबी थंडी अनुभवण्यास मिळत आहे.

    प्रदूषणातही झाली वाढ, मुंबईत काय स्थिती?

    राज्यामध्ये एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत असताना प्रदूषणाची पातळीही वाढत असल्याचं दिसत आहे. यामध्ये राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये ही प्रदूषण पातळी स्थानिक नागरिकांसाठी घातक असून निर्धारित मानकांपेक्षा हे निर्देशांक अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘वातावरण फाउंडेशन’ व ‘एन्वारोकॅटलिस्ट’ यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रातील शहरांचा 2024-25 साठीचा हवेच्या गुणवत्तेचा अहवाल प्रकाशित केला आहे. यात पीएम 2.5 ची पातळी मानकांपेक्षा निम्म्याहून अधिक शहरांत अधिक आहे. तर, पीएम 10 ची पातळी मानकांपेक्षा सर्वच शहरांमध्ये अधिक असल्याचे समोर आलं आहे. मुंबईमध्ये पीएम 2.5 ची पातळी सरासरी 35 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर नोंदली गेली आहे. ही पातळी राष्ट्रीय मर्यादेत आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा ही पातळी जास्त आहे. पीएम 10 ची सरासरी पातळी 91 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर नोंदवण्यात आली आहे. या वर्षभरात मुंबईत सातत्याने झालेले पर्जन्यवृष्टी प्रदूषण कमी होण्याला कारणीभूत आहे का, हेही यामध्ये पाहणं आवश्यक आहे. शहरातील प्रदूषण पातळीमध्ये 2019-20 पासून 12 टक्के सुधारणा झाल्याचे या अहवालात म्हटलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा