Leopard captured: कोल्हापूरच्या भरवस्तीत घुसलेल्या बिबट्याला वनविभागाने केलं जेरबंद; साडेतीन तासांच्या शर्थीनंतर संपला हायव्होल्टेज ड्रामा
कशी घडली बिबट्याच्या दहशतीची घटना
गेल्या दोन दिवसापासून कोल्हापुरातील शहरी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे चर्चा पाहायला मिळत होती. तर ताराबाई पार्क परिसरातील वूडलँड हॉटेलसमोर मंगळवारी सकाळी अचानक बिबट्याचे दर्शन झाले आणि क्षणातच परिसरात धुमाकूळ माजला. घाबरलेल्या लोकांनी दारे-खिडक्या बंद करून आश्रय घेतला. या गोंधळात बिबट्याने एका हॉटेल कर्मचाऱ्यावर झडप घातली, तर पोलिस दलातील कर्मचाऱ्यावर देखील प्राणघातक हल्ला केला. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शहरात दहशतीचे सावट पसरले.
Bihar Exit Poll : विरोधकांना आशेचा किरण, भास्कर रिपोर्टर्सच्या एक्झिट पोलमध्ये महागठबंधनला किती जागा?
बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन
वनविभाग, पोलीस आणि महानगरपालिकेच्या जवानांनी तातडीने त्याला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. नागाळा पार्क परिसरात बिबट्या असलेल्या ठिकाणाला चहुबाजूंनी जाळीने वेढण्यात आले. ड्रोनच्या मदतीने बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेतला गेला. शेवटी एका जुन्या हौदात बिबट्या दबा धरून बसल्याचा सुगावा लागला. त्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवत पिंजरा लावण्यात आला आणि वनविभागाच्या टीमने शौर्य दाखवत गुंगीचे इंजेक्शन देत त्याला अखेर बेशुद्ध केले. उपस्थित गर्दीतून टाळ्यांचा कडकडाट झाला.
बिबट्या आला कुठून याचा घेणार शोध
उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी सांगितले की, “बिबट्याने बहुधा पंचगंगा नदीकाठी असलेल्या झाडाझुडपाच्या भागातून शहरात प्रवेश केला का याचा शोध घेतला जात आहे. याबाबत तपास सुरू असून जेरबंद केलेला बिबट्या लवकरच जंगलात सोडण्यात येणार आहे.” या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असले तरी प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. मागील काही महिन्यांपासून पन्हाळा, बजागेवाडी आणि नागाळा पार्क परिसरात बिबट्यांच्या हालचाली वाढल्या असून नागरिकांत चिंतेचे सावट आहे. स्थानिकांनी वनविभागाला इतर परिसरातही कडक बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान वनविभागाने नागरिकांना सूचना दिल्या की, कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास ताबडतोब प्रशासनाशी संपर्क साधावा आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत. कोल्हापुरात मंगळवारचा दिवस प्रशासनासाठी कसोटीचा ठरला, पण अखेर त्यांच्या धाडसी कारवाईमुळे शहर पुन्हा सुरक्षित श्वास घेऊ शकले.

