Jalna Accident News : शहरात उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आदळून भीषण अपघात झाला असून यात एका तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. या सततच्या अपघातांकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी-घनसावंगी मार्गावर 7 नोव्हेंबर 2025 रोजी, शुक्रवारी सायंकाळी 8 वाजता झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दीपक हरीभाऊ सोनाटकर (वय 28) असं मृत तरुणाचं नाव आहे. एकाच वेळी दोन दुचाकी उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळून झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वडील दारू पिऊन घरी, आईला मारहाण केली; त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलाचं भयंकर कृत्य, घरातच…
घनसावंगी तालुक्यातील तनवाडी शिवारात सायंकाळी 8 वाजण्याच्या हा अपघात घडला. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर त्याची ट्रॉली रस्त्याच्या कडेला जॅक न लावता उभी होती. ट्रॉलीचे टायर आणि चाक निखळलेलं होतं. तसंच तिच्या आजूबाजूला कोणतीही सूचना किंवा रिफ्लेक्टर लावले नव्हते. दरम्यान, घनसावंगी तालुक्यातील भद्रेगाव येथील तरुण दीपक हरीभाऊ सोनाटकर (वय 28) हा दुचाकीवरून घनसावंगीच्या दिशेने जात असताना उभ्या ट्रॉलीवर जोरात आदळला. या भीषण धडकेत दीपकचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्याच ट्रॉलीला दुसरी दुचाकी देखील धडकली असून त्या वाहनचालकास गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं.
Beed Crime : ‘माझ्या नवऱ्याला महिन्याभरापासून दारु पाजून हा प्लॅन, आणि…’; मनोज जरांगे प्रकरणात आरोपी अमोल खुनेच्या बायकोचा मोठा दावा
घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरीचे जमादार पोहार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या दुचाकीस्वाराचा बळी हा केवळ ना दुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉलींनी घेतला. जर ही नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉली रिफ्लेक्टर लावून त्या ठिकाणी उभी असती, तर हा अपघात झाला नसता. मात्र वाहन चालक आणि विशेष करून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे भरधाव वाहन चालवतात, अशात नादुरुस्त झालेला ट्रॅक्टर मुख्य रोडवरच सोडतात आणि त्यावर हे अपघात घडतात आणि निष्पाप लोकांचा बळी जातो.
भाजप नेते हाजी अराफत शेख यांचा अपघात; पायाला दुखापत, ताफ्यातील अनेक गाड्यांचे नुकसान
मागील वर्षी पोलीस विभाग आणि आरटीओ विभागाने एक मोहीम राबवली होती. यात त्यांनी ट्रॅक्टर चालकांना कडक सूचना दिल्या होत्या. नादुरुस्त ट्रॅक्टर रोडच्या बाजूला उभं न करता ते दूर उभे करावेत जेणेकरून अपघात होणार नाही. मात्र यावर्षी अशी कुठलीही उपाययोजना पोलिसांनी आणि आरटीओ विभागाने केली नसल्यामुळे या अपघातात वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन होणारे अपघात टाळावे आणि निष्पाप लोकांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

