Jalgaon News: पुण्यातील कोरेगाव पार्क भूखंड प्रकरणानंतर भोसरी भूखंड प्रकरण देखील चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंबाबत खळबळजनक दावा केला आहे. राजीनामा न दिल्यास पक्षातून हकालपट्टीचा इशारा देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
गिरीश महाजन म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये असताना मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा हा नैतिकतेच्या आधारावर नव्हता, तर ‘राजीनामा द्या, नाहीतर पक्षातून हकालपट्टी करू,’ असा स्पष्ट निरोप त्यांना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आला होता.”
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगाव इथं भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. जळगाव हा भाजप व महायुतीचा बालेकिल्ला असून, सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचं महाजन यांनी सांगितलं. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंबाबत गौप्यस्फोट केला.
गिरीश महाजन म्हणाले, कसली नैतिकता? त्यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर नव्हता. माझ्यासमोरचा हा विषय आहे. जेव्हा त्यांचे प्रकरण (भोसरी भूखंड) उघडकीस आले, तेव्हा त्यांना थेट दिल्लीहून सूचना देण्यात आल्या होत्या. महाजन यांनी पुढे दावा केला की, खडसेंना पक्षाकडून स्पष्ट अल्टिमेटम देण्यात आला होता. खडसे यांना स्पष्ट सांगण्यात आलं होतं की, ‘तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर तुमची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल’.

