• Tue. Mar 10th, 2026

    Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर आतापर्यंतचा सर्वांत गंभीर आरोप; जीव घेण्यासाठी काय-काय केलं? सर्वांसमोर खळबळजनक दावा

    Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर आतापर्यंतचा सर्वांत गंभीर आरोप; जीव घेण्यासाठी काय-काय केलं? सर्वांसमोर खळबळजनक दावा

    Dhananjay Munde News: मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून जरांगे पाटील यांनी कटाचे नेतृत्व धनंजय मुंडेंनी केल्याचा दावा केला आहे. तसंच त्यांनी मराठा समाजाला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

    मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर आतापर्यंत सर्वांत गंभीर आरोप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. “माझ्या हत्येच्या कटात 10 ते 11 जण सहभागी आहेत. मी बाहेरच्या राज्यातील पासिंगची गाडी तुम्हाला देतो, असं धनंजय मुंडेंनी आरोपींना सांगितलं होतं. या सगळ्या कटाचा मूळ धनंजय मुंडे आहे,” असा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला आहे.

    आपल्यावर हल्ल्याच्या कटाचा दावा करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “जालना आणि बीड जिल्ह्यातील 100 च्या आसपास सर्वपक्षीय लोक इथं बसले होते. त्यामुळे खरं काय आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही आरोपींना पकडा, सोडा काहीही करा. पण बीडच्या नेत्याचा एका कार्यकर्ता की पीए आहे, तो पोलिसांनी माझ्या हत्येच्या कटात पकडलेल्या दोनपैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं की आपल्याला जायचं आहे. या आरोपींना त्या नेत्याच्या व्यक्तीने नेलं आणि पहिलं काम सांगितलं की खोटे रेकॉर्डिंग बनवा. नंतर त्यांनी दुसरा प्लॅन केला. खूनच करून टाकायचा किंवा गोळ्या देऊन, औषध देऊन घातपात करायचा असं ठरलं. मी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे. असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजेत, तुमच्या मुला-बाळांचं टेन्शन गेलं पाहिजे, असं काम मी करणार आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचण्याचं काम केलं. मुंडेंच्या पीएने पकडलेल्या आरोपींपैकी एकाला परळीला नेलं. तिथं धनंजय मुंडे महत्त्वाची बैठक सुरू असताना आरोपीला भेटण्यासाठी बाहेर आले आणि 20 मिनिटं आरोपीसोबत चर्चा केली. अडीच कोटींना घातपाताची डील ठरली. पण नंतर त्यांना काहीच जुळेना म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या झालटा फाटा इथं धनंजय मुंडे एक तास आरोपीची वाट पाहात थांबले. तिथं ते आरोपींना भेटले आणि गोळ्यांची वगैरे व्यवस्था करतो, असं आरोपींना सांगून धनंजय मुंडे मुंबईला गेले. आरोपी आणि धनंजय मुंडेंची वारंवार भेट झाली. भाऊबीजेच्या दिवशी पुन्हा कट रचला होता,” असा दावा जरांगे पाटलांनी केला आहे.

    दरम्यान, “घातपात करून माणूस राजकारणात मोठा होत नाही. गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं. त्यांनी लोकांचा सामाजिक उठाव केला आणि त्यातून लोकांचं सामाजिक कल्याण केलं. पण धनंजय मुंडे नीच आहेत. लोकं मारून आणि डावं करून ते समोरच्या संपवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा गंभीर आरोपही मनोज जरांगे यांनी यावेळी केला आहे.

    मराठा समाजाला आवाहन

    “मराठा समाजाने शांतता पाळावी. आपण सावध आहोत म्हणून ही घटना घडायच्या आधीच उघडकीस आली. आपण सावध नसतो तर ही घटना घडून गेली असती. त्यामुळे समाजाने शांतता पाळावी. समाजाला आनंद होईल, असंच काम करणार आहे. कारण त्यांचा नायनाट नक्की करू. राज्यातील मराठा समाजाच्या नेत्यांनी, मराठा सेवकांनी आणि सर्वच मराठा संघटनांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे. कारण आज माझ्यावर जी वेळ आली ती उद्या तुमच्यावरही येऊ शकते. त्यामुळे माझ्यावर वेळ आल्यावर तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर मी मजा बघायची, असं होता कामा नये. विरोध करणं इथपर्यंत ठीक आहे, पण एखाद्याचा जीव घ्यायचा, असा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये जो करणारा असेल त्यापेक्षा जो करवून घेणारा असेल तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठा समाजातील सरपंचापासून खासदारांपर्यंत कोणीही हा विषय सहज घेऊ नये. एकजुटीने आपल्याला असल्या वृत्तीचा नायनाट करावाच लागणार आहे. त्याशिवाय हे थांबणार नाही. पण आपल्याला शांत राहायचं आहे. काल माझ्या हत्येच्या कटाची बातमी आल्यानंतर मी शांततेचं आवाहन केलं आणि समाजानेही ते ऐकलं. असा ग्रेट समाज होणे नाही. मी सावध नसतो, तर यांचा बाप ठरलो नसतो,” असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी केला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा