• Sun. Mar 15th, 2026
    राज ठाकरे सोबत नको? काँग्रेसच्या गोटात हालचाली, पडद्यामागे काय सुरु?

    राज्याच्या राजकारणात पडद्यामागे सध्या मोठा घडामोडी सुरु आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकीकडे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात रोखठोक भूमिका मांडताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येताना दिसत आहेत. पण ते आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र येणार का? हे गुलदस्त्यात आहे. असं असलं तरी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पण मग दोन्ही ठाकरे एकत्र येणं हे काँग्रेसला मान्य असणार का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे महाराष्ट्रातील काही नेते राज ठाकरेंना सोबत नेण्यासोबत अनुकूल नसल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेसची हायकमांडसोबत चर्चा होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते हायकमांडला काय सांगतात आणि हायकमांड काय निर्णय जाहीर करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती टीव्ही 9 ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मनसेसोबत युती नको, अशी काँग्रेसची भूमिका आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांसोबत युती हवी, पण मनसेसोबत युती नको, अशी काँग्रेसची भूमिका आहे. महाराष्ट्र काँग्रेसचा हा स्थानिक पातळीवर निर्णय झाल्याची माहिती आहे. तसेच स्थानिक पातळीवरचा हा निर्णय महाराष्ट्र काँग्रेस हायकमांडला कळवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हायकमांडसोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसमधील या घडामोडींवर मनसे नेत्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
    Maharashtra Timesशरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष कुणासोबतही आघाडी करण्यास तयार, फक्त एक पक्ष सोडून!

    मनसे नेते बाळा नांदगावकर काय म्हणाले?

    “निवडणुकीत कोण कुणासोबत असेल, याबाबत कोणतीही चर्चा नाहीय”, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “कुणाशी युती किंवा आघाडी घ्यायची, असा कुठलाही विषय आमच्या चर्चेत नाही. त्यांनी काय करावं हा आमचा विषय आणि आम्ही काय करावं हा आमचा विषय आहे. मोर्च्यात आपल्याला अनेक जण एकत्र दिसले तरी आम्ही कुणाबरोबर एकत्र निवडणूक लढवू, अशी कोणतीही चर्चा नाही”, असं नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केलं.
    Maharashtra Times‘हे सरकार चोर; त्यांच्याविरुद्ध हर हर महादेव आरोळी ठोका’, उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये कडाडले

    काँग्रेसचे सचिन सावंत यांची प्रतिक्रिया

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सावंत यांनीदेखील याबाबत भूमिका मांडली आहे. “या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवरती असल्याने आमचे जे स्थानिक नेते आहेत, किंवा जिल्हा काँग्रेस कमिटींना आदेश देण्यात आले आहेत की, आघाडी करायची की स्वतंत्र लढायचं याबाबतचा निर्णय तुम्ही घ्यावा. पण आघाडी करायची असेल तर इंडिया आघाडीच्या सदस्य पक्षांशीच आघाडी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. लवकरच केंद्रीय नेतृत्व मुंबईत स्वतंत्र लढावं किंवा आघाडी कोणत्या स्वरुपाची करावी याबाबतचा निर्णय जाहीर करेल अशी अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सचिन सावंत यांनी दिली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा