• Tue. Mar 10th, 2026
    ‘पत्रकार परिषद बघून तळपायाची आग मस्तकात गेली’, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर घणाघात

    राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर करत राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. संबंधित व्हिडीओत निवडणूक आयुक्त मतदारयाद्यांमधील घोळवर भाष्य करताना दिसत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचील निवडणूक घोषित केली. यावेळी पत्रकारांनी राज्य निवडणूक आयुक्तांना दुबार मतदार, मतदान याद्यांमधील घोळ याबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यावर दिनेश वाघमारे यांनी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या प्रश्नांवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आपल्याला त्याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असं उत्तर त्यांनी एका प्रश्नावर दिलं. राज ठाकरे यांनी आयुक्तांच्या पत्रकार परिषदेची एक क्लिप शेअर करत टीका केली आहे.

    “आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय?”, असे सवाल राज ठाकरे यांनी केले आहेत.

    “महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पाहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

    राज ठाकरेंनी शेअर केलेल्या व्हिडीओत काय?

    राज ठाकरेंनी शेअर केलेल्या व्हिडीओ पत्रकार मतदार याद्यांमधील घोळबाबत प्रश्न विचारताना दिसतोय. सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नोंद झालीय. त्यावर काय सांगाल? त्यावर “आम्ही केंद्रीय निवडणूकआयोगाकडून मतदार यादी घेतो”, असं उत्तर आयुक्तांनी दिलं. त्यावर पत्रकार मतदार याद्यांवर तुमचा वचक नाही का? असा प्रश्न विचारतो. त्यावर “आम्ही फक्त ती यादी अॅडॉप्ट करतो”, असं उत्तर आयुक्तांनी दिलं. मग मतदारयाद्यांची शहानिशा कोण करतं? असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं.

    “आम्ही शाहानिशा देखील करतो. दुबार मतदारअसतील तर बघतो. चुकीच्या प्रभागात गेलं का ते आम्ही बघतो. विधानसभेच्या यादी नाव आहे, पण यामध्ये नसेल तर ते आम्ही बघतो. काही चुका असतील तर ते आम्ही करतो”, असं आयुक्त म्हणाले.

    ज्या ठिकाणी जागाच नाही तिथे मतदारांचा पत्ता नोंद आहे. त्याबाबत कुणाची तरी जबाबदारी असेल ना? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी निश्चित केलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाचीजी जबाबदारी आहे ती राज्य निवडणूक आयोगाची आहे. भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहे ते भारत निवडणूक आयोगाचे आहेत”, असं उत्तर आयुक्तांनी दिलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा