राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर करत राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. संबंधित व्हिडीओत निवडणूक आयुक्त मतदारयाद्यांमधील घोळवर भाष्य करताना दिसत आहेत.
“आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय?”, असे सवाल राज ठाकरे यांनी केले आहेत.
“महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पाहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी शेअर केलेल्या व्हिडीओत काय?
राज ठाकरेंनी शेअर केलेल्या व्हिडीओ पत्रकार मतदार याद्यांमधील घोळबाबत प्रश्न विचारताना दिसतोय. सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नोंद झालीय. त्यावर काय सांगाल? त्यावर “आम्ही केंद्रीय निवडणूकआयोगाकडून मतदार यादी घेतो”, असं उत्तर आयुक्तांनी दिलं. त्यावर पत्रकार मतदार याद्यांवर तुमचा वचक नाही का? असा प्रश्न विचारतो. त्यावर “आम्ही फक्त ती यादी अॅडॉप्ट करतो”, असं उत्तर आयुक्तांनी दिलं. मग मतदारयाद्यांची शहानिशा कोण करतं? असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं.
“आम्ही शाहानिशा देखील करतो. दुबार मतदारअसतील तर बघतो. चुकीच्या प्रभागात गेलं का ते आम्ही बघतो. विधानसभेच्या यादी नाव आहे, पण यामध्ये नसेल तर ते आम्ही बघतो. काही चुका असतील तर ते आम्ही करतो”, असं आयुक्त म्हणाले.
ज्या ठिकाणी जागाच नाही तिथे मतदारांचा पत्ता नोंद आहे. त्याबाबत कुणाची तरी जबाबदारी असेल ना? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी निश्चित केलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाचीजी जबाबदारी आहे ती राज्य निवडणूक आयोगाची आहे. भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहे ते भारत निवडणूक आयोगाचे आहेत”, असं उत्तर आयुक्तांनी दिलं.

