भाजप नेत्या तथा अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. नवनीत राणा यांना नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पायाला झालेल्या गाठीमुळे नागपूरमधील नरेंद्रनगर येथील सुयोग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या जुन्या इजेचा त्रास पुन्हा उद्भवल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आलं. सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश मोटवानी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्या उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील २५ दिवस त्यांना पूर्ण बेडरेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नवनीत राणा यांच्या पायाला झालेली दुखापत ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात झालेल्या फ्रॅक्चरशी संबंधित असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे. निवडणुकीच्या काळात सतत प्रवास, सभा आणि जनसंपर्क मोहिमेमुळे त्या इजेला पूर्ण विश्रांती मिळाली नव्हती. त्यामुळे आता त्याच ठिकाणी सूज आणि गाठ तयार झाली आहे. अमरावती येथील नामांकित ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. शाम राठी यांच्या सल्ल्यानुसार नवनीत राणा यांना नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांना काही काळ शारीरिक हालचाल टाळावी लागेल आणि आवश्यक ते उपचार पूर्ण केल्यानंतरच त्या पुन्हा राजकीय कार्यात सहभागी होऊ शकतील. त्यांचे पती आमदार रवी राणा हे सतत रुग्णालयात त्यांच्या सोबत उपस्थित आहेत. फडणवीसांचा इफ्तार पार्टीतला फोटो टाकत मनसेचे राजू पाटील म्हणाले, ‘बोट ठेवलं की भाजप चिडतो’
रुग्णालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त
दरम्यान, नवनीत राणा यांना काही दिवसांपूर्वी धमक्या मिळाल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे. रुग्णालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून केवळ त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच भेटण्याची परवानगी दिली जात आहे. पोलिसांकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. कारण नवनीत राणा यांना नुकत्याच काही दिवसांत दोनवेळा धमकी देण्यात आली आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून डॉक्टरांनी योग्य उपचार आणि पूर्ण विश्रांती घेतल्यास त्या लवकरच पुन्हा तंदुरुस्त होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा