• Mon. Jun 15th, 2026

    Satara Crime: बदला नाही घ्यायचा, आपल्याला तर…; सातारा डॉक्टर तरुणी मृत्यूवरून संशयाची सुई, निंबाळकर नक्की काय म्हणाले?

    Satara Crime: बदला नाही घ्यायचा, आपल्याला तर…; सातारा डॉक्टर तरुणी मृत्यूवरून संशयाची सुई, निंबाळकर नक्की काय म्हणाले?

    Ranjeetsingh Naik Nimbalkar: सातारा जिल्ह्यात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. या आरोपांना आक्रमक उत्तर देणाऱ्या कार्यकर्त्यांना निंबाळकर यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे.

    सातारा डॉक्टर तरुणी मृत्यूवरून संशयाची सुई, निंबाळकर नक्की काय म्हणाले?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सातारा: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. निंबाळकर यांच्या कारखान्याच्या वसुलीसाठी पोलीस वैद्यकीय रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर तरुणीवर दबाव आणत होते आणि याच दबावामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास होत होता, असा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर कारवाईची मागणी काही राजकीय नेत्यांकडून होत आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना निंबाळकर यांचे समर्थक थेट धमकीची भाषा वापरत आरोप करणाऱ्या नेत्यांना फोन करत आहेत. या पार्श्वभूमीवर रणजितसिंह निंबाळकर यांनी एक व्हिडिओ जारी करत कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

    रणजितसिंह निंबाळकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे की, “सर्व सहकाऱ्यांना मी आवाहन करतो, गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून माझ्यावर आरोपांची राळ उठवली जात आहे. आपल्यालाही माहीत आहे की, जे लोक माझ्यावर आरोप करत आहेत ते चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करत आहेत. पण माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. मी काही ऑडिओ क्लिप ऐकल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेबूब शेख यांच्यासोबतचा फोन असेल किंवा सुषमा अंधारे यांच्याबद्दल एकेरी पद्धतीने भाषा वापरणं असेल. कृपया माझी सर्व समर्थकांना विनंती आहे की, संवैधानिक भाषेतून आपण त्यांच्याशी लढू. त्यांच्या आरोपांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू. तरीही त्यांचं समाधान नाही झालं तर आपण त्यांना कायदेशीर उत्तर देऊ. मात्र अयोग्य पद्धतीने त्यांच्यावर टीका करू नये,” असं म्हणत निंबाळकर यांनी संघर्ष टाळण्याचं आवाहन केलं आहे.

    दरम्यान, “आपण आपली संस्कृती, आपली परंपरा टिकवायची आहे. आपल्याला बदला घ्यायचा नाही तर बदलाव करायचा आहे. जी घोषणा आपण वर्षभरापूर्वी केलेली आहे त्या घोषणेला अनुसरून आपलं वागणं असावं,” असंही कार्यकर्त्यांना उद्देशून रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

    निंबाळकरांवर नेमका आरोप काय?

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मागील दोन दिवसांत प्रसारमाध्यमांसमोर येत रणजितसिंह निंबाळकर यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली आहे. “फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या नसून, संस्थात्मक हत्या असल्याचा आमचा दाट संशय आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दबावातून हा प्रकार घडला असून मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट देण्याची घाई करू नये. क्लीन चिट म्हणजे पोलिसांनी तपास थांबवण्याचे अलिखित संकेत असून या प्रकरणी चौकशीसाठी उच्च न्यायालयाने समिती स्थापन करावी,” अशी मागणी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केली. “निंबाळकर हे बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार त्यांच्या साखर कारखान्यासाठी आणत होते. कामगार कारखाना सोडून जाऊ नयेत म्हणून ते कामगारांच्या तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र देण्यासाठी महिला डॉक्टरवर दबाव टाकत. याबाबत संबंधित महिलेनं वरिष्ठांनाही पत्र दिलं होतं,” असा दावा अंधारे यांनी केला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा