• Tue. Mar 10th, 2026

    अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, एकनाथ शिंदेंकडून धंगेकरांची पाठराखण; पण पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकले, म्हणाले…

    अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, एकनाथ शिंदेंकडून धंगेकरांची पाठराखण; पण पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकले, म्हणाले…

    Eknath Shinde On Ravindra Dhangekar: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जैन मंदिराच्या आणि हॉस्टेलच्या जागेवरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

    shinde dhangekar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही, विरोधकांच्या हातात कोणतेही कोलित द्यायचे नाही, शेवटी महायुती आहे. मात्र, धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता आहे. त्यांना जी माहिती मिळाली त्यावर ते बोलले. माझी भाजप विरोधात भूमिका नाही, असे त्यांनी म्हटले आहे,’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    शिवसेना हा पक्ष महायुतीचा घटक असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी अशी मागणी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे हे एका कार्यक्रमासाठी आळंदी येथे आले असता याबाबत पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारले. त्यावर, त्यांमी वरील उत्तर दिले. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. भाजप विरोधात माझी भूमिका नाही, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे, असेही ते म्हणाले.
    Maharashtra TimesPune News : कामथडी गणाची ‘समिती’ कुणाकडे? भाजपचा उमेदवार गुलदस्त्यात; ‘मुळशी’च्या मुलाखती झाल्या, ‘भोर’च्या कधी?
    धंगेकरांना पाठिंबा आहे का ?
    पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, तुमचा धंगेकरांना पाठिंबा आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर शिंदे यांनी उत्तर देणे टाळले. तरीही पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आता तुम्हाला माझ्या तोंडातून काही काढायचे आहे का, असे बोलून शिंदे तिथून निघून गेले.

    Maharashtra Timesपुण्यात बहिणीला व्हिडिओ कॉल करत भावाने मृत्यूला कवटाळले; मी आता जातो, पण…; बायकोबद्दल काय म्हणाला ?
    इंद्रायणीसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज
    राज्य सरकारकडून आळंदी येथील भक्तनिवास बांधकामासाठी एकूण २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी १० कोटी रुपयांचा निधी तत्काळ देण्यात आला आहे. सुमारे ९,८१३ चौरस मीटर जागेत ३२५ व्यक्तींसाठी राहण्याची सोय असलेली इमारत बांधण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर ही इमारत संस्थान समितीकडे वापर व देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात येईल; तसेच महाद्वार घाट सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. देहू आणि आळंदी हे महाराष्ट्राच्या श्रद्धेचे तीर्थक्षेत्र असून, या तीर्थक्षेत्रातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे पात्र हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असून, या प्रकल्पासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन कार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा