• Fri. Mar 6th, 2026
    दिवाळी सणाला गालबोट! मुंबईत दोन दिवसांतील दुर्घटनांत दोघांचा मृत्यू, तर 28 जण जखमी

    Mumbai News: जोगेश्वरी पश्चिमेला एस. व्ही. रोड येथील १३ मजली बिझनेस सेंटरला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. यामध्ये १७ जण जखमी झाले आहेत.

    JMS business centre in Jogeshwari West(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : ऐन दिवाळीच्या उत्सवात मुंबईमध्ये विविध दुर्घटना घडल्या. सलग दोन दिवस घडलेल्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू, तर २८ जण जखमी झाले आहेत. बोरिवली पश्चिमेकडे एका चाळीत लागलेल्या आगीत ३७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर मालाडमधील अक्सा समुद्रात १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

    गोराई क्रमांक दोन येथील एका चाळीतील एक मजली बांधकामाला बुधवारी ११.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये सजावटीचे साहित्य, फर्निचर, कपडे यांसह अन्य वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. साधारण अडीच तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. दोन पुरुष पहिल्या मजल्यावरील पायऱ्यांवरून त्वरित उतरल्याने त्यांची सुखरूप सुटका झाली. पूजा पारेख (३७) मात्र बाथरूममध्ये अडकल्या. त्यांना अग्निशमन दलाने बाहेर काढले. त्या ५० टक्के भाजल्या होत्या. धुरामुळे त्यांना श्वसनाचा त्रासही जाणवू लागला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
    Maharashtra TimesMaharashtra Weather: राज्यात दोन दिवस पावसाचे! ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट जारी, काय सांगतो IMDचा अंदाज?
    दुसऱ्या एका घटनेत मालाड पश्चिमेला लिंक रोडवरील सात मजली भूमी क्लासिकल इमारतीच्या सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील पाच घरांत बुधवारी पहाटे ५.१५ वाजता आग लागली. सहाव्या मजल्यावर लागलेली आग सातव्या मजल्यापर्यंत पसरली. या आगीत इलेक्ट्रिक वायर, फर्निचर, कपडे, खाटा, खुर्च्या, टेबल, वातानुकूलित यंत्रणा आदी सामान जळून खाक झाले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला दोन तास लागले. या घटनेत जीव वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शुभम अगोतरिया (२४) याच्या डाव्या हाताला, तर जाधव नामक अन्य एका व्यक्तीच्या डाव्या पायाला इजा झाली. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

    बांधकाम पडून सात जण जखमी
    भायखळा पश्चिमेला मदनपुरा येथे बुधवारी दुपारी १२.४५ वाजता एक मजली इमारतीचा काही भाग कोसळला. यामध्ये सात जण जखमी झाले. गुलाम रसूल, मोहम्मद सय्यद, आरिफ, सत्तार, मोहम्मद, सामसूल, कॅथरीन अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    Maharashtra TimesDevendra Fadnavis: दिल्ली अजून दूर, 2029पर्यंत मीच…; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा
    स्वयंपाकघराचा भाग – कोसळून दोन जखमी
    चिराबाजारमधील जे. एस. एस. मार्गावरील म्हाडाच्या आत्माराम इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्वयंपाकघराचा भाग तळमजल्यावर कोसळला. बुधवारी पहाटे ६.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ठक्करजी गाला (७५) आणि गुणवंती गाला (७१) हे यामध्ये जखमी झाले. त्यांच्यावर भाटिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा