• Mon. Aug 17th, 2026

Nanded News : नक्षलवाद्यांचा हल्ला, हाताला दोन गोळ्या लागल्या, तरीही कमांडो शाहरुख खान लढले, 5 सहकाऱ्यांचे प्राण वाचवले, नांदेडमध्ये सत्कार

नक्षली हल्ल्यात दोन गोळ्या लागूनही नक्षलवाद्यांशी दोन हात करत 5 सहकाऱ्यांचे प्राण वाचवणारे कमांडो शाहरुख खान यांचा नांदेडमध्ये सत्कार करण्यात आला. ‘कोब्रा’ कमांडो शाहरूख खान यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
​नांदेड : तीन वर्षांपूर्वी झारखंडमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात नांदेडचे सुपुत्र आणि ‘कोब्रा’ कमांडो फारुकी शाहरूख खान अजीज खान हे गंभीर जखमी झाले होते. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या हाताला दोन गोळ्या लागल्या होत्या. मात्र, अशा अत्यंत बिकट आणि जखमी अवस्थेतही त्यांनी न घाबरता नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले; सोबतच आपल्या पाच सहकाऱ्यांचे प्राणही वाचवले.​ या शौर्याबद्दल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शाहरूख खान यांना ताम्रपट देऊन सन्मानित करण्यात आले.

​फारुकी शाहरूख खान अजीज खान हे माहूर तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबात आई आणि सहा भाऊ आहेत. 2010 मध्ये शाहरूख खान यांच्या वडिलांचे निधन झाले. स्पेशल फोर्समध्ये जाऊन कमांडो बनायचे आणि देशाचे रक्षण करायचे, हेच त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. हे स्वप्न उराशी बाळगून 2017 मध्ये शाहरूख हे सीआरपीएफ (CRPF) मध्ये भरती झाले आणि पुढे अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या ‘कोब्रा’ बटालियनमध्ये त्यांची निवड झाली.

नक्षलवाद्यांच्या आयईडी हल्ल्यात गंभीर जखमी

‘कोब्रा’ बटालियन ही नक्षलविरोधी कारवायांमध्ये विशेष मोहिमा राबवते. जानेवारी 2023 मध्ये झारखंड राज्यातील नक्षलग्रस्त भागात ‘ऑपरेशन जुवेन्तस’ राबवण्यात आले होते. या मोहिमे दरम्यान नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी (IED) स्फोटात शाहरूख गंभीर जखमी झाले, तसेच दोन गोळ्या त्यांच्या हाताला लागल्या.

शाहरुख यांच्या अतुलनीय शौर्यासाठी पदक प्रदान

अत्यंत वेदनादायी आणि जखमी अवस्थेतही त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना करत नक्षलवाद्यांशी लढा दिला व आपल्या जखमी सहकाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. ​त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांची राष्ट्रपती पराक्रम पदकासाठी निवड झाली. हे पदक भारतीय लष्करी आणि निमलष्करी दलातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानले जाते.

नांदेड जिल्हा प्रशासनाकडून कौतुक

शाहरूख यांच्या या देशसेवेचे नांदेड जिल्हा प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजरोहण सोहळ्यात पालकमंत्री अतुल सावे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांना ताम्रपट देऊन गौरवण्यात आले.

कमांडो शाहरुख खान यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, राष्ट्रपती पराक्रम पदकासाठी निवड झाल्याने तसेच प्रशासनाकडून ताम्रपट देऊन सन्मान केल्याने शाहरुख खान यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज मला मिळालेला हा पुरस्कार केवळ माझा सन्मान नाही. हा माझ्या कुटुंबाच्या त्यागाचा, माझ्या मोठ्या भावांच्या संघर्षाचा, माझ्या सहकाऱ्यांच्या शौर्याचा आणि माझ्या मातृभूमीप्रती असलेल्या निष्ठेचा सन्मान आहे. शिवाय हा पुरस्कार माझ्या मोठ्या भावाला आणि देशाच्या शूर जवानांना समर्पित केल्याची भावना जवानाने व्यक्त केली आहे.

“सुदैवाने आयुष्यात अशी संधी माझ्यासमोर आली. ११ जानेवारी २०२३ रोजी एका अत्यंत कठीण आणि जीवघेण्या नक्षलविरोधी कारवाईमध्ये आम्हाला मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागलं. त्या कारवाईमध्ये अनेक नक्षलवादी मारले गेले. या चकमकीदरम्यान मी स्वतः गंभीररीत्या जखमी झालो; मात्र त्या परिस्थितीतही माझ्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी आणि माझ्यावर सोपवलेलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केला”, असं कमांडो शाहरुख खान म्हणाले.

“माझ्या शरीरावर जखमा झाल्या, पण माझ्या मनातील देशसेवेची जिद्द कधीही जखमी झाली नाही. कारण माझ्यासाठी कमांडो होणं ही केवळ नोकरी नव्हती; ती माझ्या आयुष्याची शपथ होती”, अशी भावना कोब्रा कमांडो शाहरुख खान यांनी व्यक्त केली.