Raigad man attacked: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे जवळील दत्तवाडी परिसरात केवळ साठ रुपयांच्या वादातून एका पिकअप चालकावर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाला असून, खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तवाडी गावाजवळील बाळू गोरे यांच्या चहाच्या टपरीवर नौशाद राजपुत हे चहा घेत बसले होते. त्याच वेळी पाच अनोळखी इसमांनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण सुरू केली. आरोपींपैकी दोन जणांनी नौशाद यांना विचारले – “आमच्याकडून भाड्याचे साठ रुपये का घेतलेस?” असे म्हणत दारूच्या नशेत शिवीगाळ आणि हाताबुक्याने मारहाण केली.
दिवाळीच्या सणातच कोल्हापूर हादरले! तरुणाची निर्घृण हत्या, मित्रांसोबत गप्पा मारून घरी जाताना…
यानंतर त्यातील एकाने आणखी तीन साथीदारांना बोलावून घेतले आणि पाच जणांच्या टोळीने नौशाद यांना वेढून घेतले. यापैकी एका इसमाने हातातील कोयत्याने त्यांच्या डोक्यात आणि उजव्या हाताच्या मनगटावर वार केले, ज्यात ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २७०/२०२५ नोंदवण्यात आला असून आरोपींवर भारतीय न्यायसंहिता कलम ११८(२), ११५(२), ३५२, १८९, १९१, १९१(२), १९१(३) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, २७(१)(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अल्प कारणावरून हिंसाचाराचा प्रकार वाढत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुतुहलापोटी वाकले अन् दृष्टी गमावून बसले; दिवाळीत 125 जणांनी डोळे गमावले, 150 रुपयांचा जुगाड महागात
ऐरोलीमध्ये अपघात
दरम्यान, आज सकाळी आणखी एक अपघाताची घटना ऐरोली पुलावर घडली. एका BEST बस आणि टेम्पोमध्ये झालेल्या धडकेत सात जण जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोन जणांना पुरुष शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे, तर उर्वरित पाच जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून तपास सुरू असून, या घटनेनंतर एरोली परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

