Chandrapur Farmer Killed in Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका शेतकऱ्यावर शेतात वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार झाला आहे. या घटनेमुळे शेतकरी आता शेतात जाण्यासही घाबरत आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी भाऊजी पाल नेहमीप्रमाणे आपल्या बैलांना शेतात घेऊन गेले. त्यांनी बैलांना चारण्यासाठी मोकळं सोडलं आणि घरी परत आले. सायंकाळी ते बैलांना परत आणण्यासाठी शेताकडे गेले. मात्र, रात्र झाली ती ते पुन्हा घरी परतले नाही. कुटुंबीयांना चिंता वाटली. त्यांनी गावकऱ्यांना सोबत घेत शोधाशोध केली. पण त्यांचा शोध लागला नाही. काल रविवारी कुटुंबीयासह गावकऱ्यांनी शोधमोहीम पुन्हा सुरू केली. यावेळी शेताच्या परिसरात भीषण दृश्य दिसलं. भाऊजी पाल यांच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले होते आणि ते तुकडे विविध ठिकाणी विखुरलेले होते. हे दृश्य बघताच गावकरी हादरले.
मोठी बातमी: शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणावरून खळबळ, पोलिसांनी उचललं पहिलं पाऊल
त्यानंतर या संपूर्ण घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी मृतदेहाचे तुकडे गोळा केली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून अशा प्रकारे शरीराचे तुकडे विखुरले जाण्याची घटना या भागात पहिल्यांदाच घडली आहे. सदर परिसरात वनविभागाने पथक तैनात केलं आहे. वाघाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परिसरातील गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गोंडपिपरी तालुक्यात याआधी वाघाच्या हल्ल्याची अशी घटना समोर आली नव्हती. मात्र, आता या घटनेनंतर शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे.
पुण्यातून मराठवाड्यात जाण्यासाठी दिवाळी विशेष रेल्वे; नांदेड-हडपसर ट्रेनमुळे प्रवाशांना फायदा, कोणत्या स्थानकांत थांबे?
अनेक गावांमध्ये शेतकरी शेतात जाण्यास घाबरू लागले आहेत. सध्या सोयाबीन, कापूस, धान शेतात उभं आहे. शेतकऱ्यांना शेतात रोजच जावं लागतं. ही घटना घडल्यानं शेतात काम करायला शेतमजूर घाबरत आहेत. जिल्ह्यातील वाघांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गोंडपिपरीसारख्या ग्रामीण भागात बऱ्याच वर्षांपासून वाघाच्या घटना घडलेल्या नव्हत्या. या घटनेमुळे शेतकरी समुदाय अस्वस्थ झाला आहे.

