Farmer News: वैजापूर तालुक्यातील सुरळा येथे शेतातील विहिरीवर विद्युत मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत हा अपघात झाल्याने आहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर प्रशासनाने शेतकऱ्यांना विद्युत मोटर हाताळताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.
विलास शिवहरी आहेर (वय 48, राहणार सुरळा, तालुका वैजापूर) असं मयत झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, विलास हे पत्नी दोन मुलांसह सुरळा येथे राहतात. त्यांना गट क्रमांक 207 मध्ये शेती आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विलास हे शेतात गेले होते. पिकाला पाणी देण्यासाठी ते विहिरी जवळ गेले. विद्युत मोटर सुरू करत असताना त्यांना अचानक विजेचा धक्का लागला. यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत जागेवर पडले. ही बाब नातेवाईकाच्या लक्षात येताच विलास अहिर यांना तात्काळ वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली नातेवाईक व गावकरी रुग्णालयात दाखल झाले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात टाहो फोडला. तर ऐन दिवाळीमध्ये घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे आहेर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसंच या घटनेनंतर गावकऱ्यांनी देखील हळहळ व्यक्त केली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, विद्युत मोटरमुळे विजेचा धक्का बसल्याच्या अनेक घटना राज्यातील विविध ठिकाणी घडत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरक्षेची अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात असून योग्य त्या उपाययोजना केल्यानंतरच विद्युत मोटर हाताळली पाहिजे, असं आवाहन प्रशासनाकडून शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे.

