• Sat. Mar 7th, 2026
    बिबट्याचा हल्ला की आणखी काही? दिवाळीपूर्वी शाहूवाडीतल्या वृद्ध दाम्पत्याचा करुण अंत, भयावह घटनेनं खळबळ

    कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दांपत्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शाहूवाडीमध्ये परळीनिनाई परिसरात शनिवारी रात्री उशिरा बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार झाले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, निनू यशवंत कंक (वय 75) आणि रखुबाई निनू कंक (वय 70) हे वृद्ध दांपत्य गोलीवणे धनगरवाडा येथील रहिवासी आहेत. कंक दांपत्य दररोज शेळ्या चरण्यासाठी घेऊन जात असते. रोजच्याप्रमाणे परळीनिनाई धरणाच्या बॅकवॉटर परिसरात शनिवारी शेळ्यांना चरण्यासाठी ते घेऊन गेले होते. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला.
    Maharashtra Timesशनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा दावा, सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत टोकाची जुंपली, मेधा कुलकर्णींच्या अटकेची मागणी

    बॅकवॉटर परिसरात आढळले मृतदेह

    पहाटेच्या सुमारास धरणाच्या काठावर गावकऱ्यांना संशयास्पद चित्र पाहायला मिळाले. शोधा दरम्यान रखूबाई यांच्या शरीराचे काही तुकडे आणि कपडे झुडपात पडलेले दिसले, तर निनू कंक यांचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना सापडला. दोन्ही शेळ्या गायब असल्याने आणि मृतदेहावर झालेल्या जखमांवरून हा बिबट्याचा हल्ला असल्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे.

    मृत्यूचे नेमके कारण होईल निश्चित

    या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि शाहूवाडी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. बिबट्याने हल्ला केला आहे की काही घातपात झाला आहे, याबाबत तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण निश्चित होईल., असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

    ठोस उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी

    परळीनिनाई परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्यांच्या हालचाली वाढल्याबद्दल स्थानिकांनी वारंवार तक्रारी नोंदवल्या होत्या. तरीही ठोस उपाययोजना न झाल्याने आता ग्रामस्थांचा संताप वाढला आहे. “बिबट्याचा बंदोबस्त केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.

    हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

    दरम्यान, परळीनिनाई हे डोंगर-झाडी आणि धरणाच्या परिसरात वसलेले गाव असल्याने येथे राजरोसपणे वन्यप्राणी दिसतात. मात्र दिवाळी सणासुदीच्या काळात अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडल्याने ग्रामस्थ शोकाकुल झाले आहेत. कष्टकरी कंक दांपत्याच्या निधनाने संपूर्ण गोलीवणे परिसर दुःखात बुडाला आहे. तर दुसरीकडे बिबट्याच्या वावरामुळे शाहूवाडी तालुक्यातील नागरिक भितीच्या छायेत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा