• Thu. Jun 11th, 2026
    ‘माझी कनिष्का…’; नवीन पतंग घेऊन परतताना काळाचा घाला, रेल्वेखाली चिरडून चिमुकलीचा अंत; धाकट्या लेकीला पाहून आई-बापाचा टाहो

    Gondiya Girl Dies Under Train : गोंदिया जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पतंग खरेदी करुन येताना एका नऊ वर्षीय चिमुकलीचा रेल्वेखाली चिरडून दुर्दैवी अंत झाला आहे. दोन लेकींमधील धाकटी लेक गेल्यानं आई-वडिलांनी एकच टाहो फोडला.

    गोंदिया मुलीचा रेल्वेखाली मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली गावात काल गुरुवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनं संपूर्ण परिसर हळहळला आहे. फक्त पतंग आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या एका नऊ वर्षांच्या चिमुकलीचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. कनिष्का शशिकांत मेश्राम असं या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे.

    भरधाव रेल्वेनं चिमुरडीला चिरडलं

    अधिकची माहिती अशी की, काल गुरुवारी सायंकाळी कनिष्का आपल्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणींसोबत खेळत होती. तिला पतंग घ्यायचं असल्यानं तिने घरून काही पैसे घेतले आणि रेल्वेरूळ ओलांडून समोरील दुकानात गेली. पतंग खरेदी केल्यानंतर ती आनंदाने घरी परतत होती. मात्र, तेवढ्यात रायपूरहून नागपूरकडे भरधाव वेगाने धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडीने तिला चिरडलं. धडकेचा आवाज होताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत होत्याचं नव्हतं झालेलं, कनिष्काचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मेश्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलीचा मृतदेह पाहताच आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. संपूर्ण गाव या घटनेनं स्तब्ध झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Maharashtra Timesआधी पावसाने झोडपलं, नंतर सरकारने नाडलं; शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, राऊत कुटुंबाची दिवाळी कडू!

    रेल्वे प्रशासनाविरुद्ध संताप

    कनिष्काच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, या ठिकाणी पूर्वी एक रेल्वेगेट होतं. मात्र, चार महिन्यांपूर्वी रेल्वे विभागानं ते बंद करून उड्डाणपूल तयार केला आहे. पुलावरून जाण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. त्यामुळे अनेक नागरिक, विशेषतः विद्यार्थी आणि पादचारी, रोजचा मार्ग कमी करण्यासाठी थेट रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळे या ठिकाणी अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. कनिष्काचा मृत्यूही अशाच दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. गावकऱ्यांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाने येथे सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

    Maharashtra TimesRatnagiri News: माझ्या मुलीचा खूप छळ केला, लेक गमावलेल्या आईने काय-काय सांगितलं? रत्नागिरी विवाहिता मृत्यू प्रकरणात नवी माहिती

    कनिष्का ही शशिकांत मेश्राम यांच्या दोन मुलींमधील लहान मुलगी होती. तिची मोठी बहीण सहावीत शिकत असून, कनिष्का चौथीच्या वर्गात होती. तिचे वडील सालेकसा नगर परिषदेत, तर आई आमगाव नगर परिषदेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. कनिष्काच्या अचानक मृत्यूनं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका क्षणात आपल्या गोड मुलीला गमावलेल्या मेश्राम दाम्पत्यांचं दु:ख शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा